नवी दिल्ली : विशेष सुरक्षा दलाद्वारे महत्वाच्या व्यक्तींना देण्यात येणारी सुरक्षा आता आणखी कडक करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या नियमावलींचे पालन करण्याच्या निर्देशांसह आता परदेशात जातानाही एका सुरक्षा गटाला सोबत नेणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते, राहुल गांधी, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ही सुरक्षा पुरवण्यात येते. त्यामुळे परदेश दौऱ्यासाठी चर्चेत असलेल्या राहुल गांधी यांना बॅंकॉकला एकटे जाता येणार नाही.
दरम्यान, कॉंग्रेसच्या नेत्यांनी सरकारने आमच्यावर नजर ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. मात्र, भाजपने हा मुद्दा खोडून काढत सुरक्षेच्या कारणास्तव हा बदल करण्यात आल्याचे म्हटले आहे. यापूर्वी गृहमंत्रालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या विशेष सुरक्षेचा दर्जा रद्द केला आहे.