हरियाणा : येत्या ५ ते ६ वर्षांत जम्मू काश्मीरला विकसित राज्य बनवणार असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. गुरुवारी हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकेच्या प्रचार सभेला संबोधित करताना ते म्हणाले, जनसंघाचे नेते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी भारताच्या अखंडतेसाठी बलिदान दिले. यापुढे देशात दोन कायदे, दोन प्रमुख आणि दोन गुणांचे अनुसरण भारतात होणार नाही. कलम ३७०मुळे जम्मू-काश्मीरचा विकास रखडला आहे. कलम ३७०रद्द केल्यानंतर आपण आता जम्मू-काश्मीरला ५ ते ७ वर्षांत एक विकसित राज्य बनवू," असे आश्वासन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिले
तसेच पुढील आठवड्यात राजनाथ सिंग हे लडाखला भेट देणार असून सीमाभागातील सुरक्षाव्यवस्थेची यावेळी पाहणी करतील. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना लागून असणाऱ्या सीमांच्या सुरक्षिततेचा आढावा ते यावेळी घेतील, अशी माहिती संरक्षण विभागाकडून कळते.
यापूर्वी भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, जम्मू-काश्मीर लवकरच विकासाच्या मार्गावर धावणार आहे. अमित शहा म्हणाले की, “कलम ३७०मुळे जम्मू-काश्मीरमध्ये तीन प्रमुख समस्या होत्या. पहिली फुटीरतावाद आणि दहशतवाद, दुसरी - भ्रष्टाचार, तिसरी - विकास कामाचे धोरण नसणे. आता दहशतवादाची मूळ समस्या दूर झाली आहे, त्यामुळे यापुढे भ्रष्टाचारावर कडक कारवाई केली जाईल आणि विकास वाढेल ”.