मुंबई : आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राने बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत १ लाख १५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. यामुळे राज्यातील सिंचन क्षमतेत २२ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
केंद्राने घोषित केलेल्या पॅकेजमुळे राज्यात सिंचनासाठी मोठी मदत होणार असून सिंचन क्षमता वाढून राज्यातील ३ लाख ७७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामुळे अनेक अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्यास हातभार लागणार आहे. या योजनेमध्ये राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून ४० हजार कोटी रुपये केंद्राकडून आणि ७५ हजार कोटी रुपये नाबार्डकडून असे एकूण १ लाख १५ हजार कोटी रुपये यासाठी देण्यात आले असल्याचीही माहिती गडकरी यांनी दिली.