ग्रामस्थांचा इशारा
पाचोरा :
कुर्हाड गावासाठी बिल्दिधरणातून मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना सुरू करुन तेथून पाणी घ्यावे. कोकडी ( म्हसाळा) धरणातून पाणी घेतल्यास होणार्या परिणामांना शासन जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दिवसेंदिवस पाणी टंचाई गंभीर स्वरुप धारण करीत आहे. अंबे वडगाव ता. पाचोरा येथून जवळच असलेल्या कोकडी ( म्हसाळा) धरणात शून्य जलसाठा असून या धरणात असलेल्या आहे.त्या जलसाठ्यावर कळमसरा, कोकडी तांडा, अंबे वडगाव या गावांना पाणी पुरवठा केला जातो. तसेच कळमसरा, कोकडी तांडा, मालखेडा, जोगे वडगाव, कुहाड, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक या गावातील पशूधन तसेच जवळच असलेले मालखेडा, लाख व कुहाड लगत असलेल्या राखीव जंगलातील हरण, निलगाय, रानडुक्कर, कोल्हे, तडस व ईतर जंगली प्राण्यांना पाणी पिण्यासाठी एकमेव परंतु अल्पशा जलसाठा उपलब्ध आहे.
तसेच पाणी टंचाई जाणवत असून अंबे वडगावला व कोठडी तांड्याला पंधरा दिवसांनी कळमसरा गावाला एक महिन्यातून एकचवेळ पाणी पुरवठा केला जात आहे.
त्यातच कुहाड गावाला पाणी टंचाई जाणवत असल्याने त्यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बिल्धी धरणातून नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करुन घेतली आहे व तेथून पाणी ही उपलब्ध होणार आहे.
तरीही कुर्हाड ग्रामपंचायतचे प्रशासक आर. एस. धस यांनी विहीर खोदण्याची कोणतीही रितसर परवानगी न घेताच शासनाचे नियम धाब्यावर बसवून धरणाचे भिंतीलगत जवळच अनाधिकृत विनापरवाना विहीरीचे खोदकाम सुरु करुन त्या विहीरीत बल्टींग फोडून मोठ मोठे स्फोट करुन विहीरीचे काम जलदगतीने करण्याचा प्रयत्न करत आहे. या स्फोटात धरणाच्या भिंतीला धोका होऊ शकतो असे मत आंबे वडगावचे उपसरपंच ऍड. मंगेश गायकवाड व सूज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
त्यातच प्रशासक महाशय इथेच थांबले नाहीत तर त्यांनी सोमवारी त्या विहीरीत प्रेशरबोअर करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंबे वडगाव , कोटडी तांडा व पंचक्रोशीतील जनतेने प्रेशरबोअर करु दिला नाही व गुराढोरांसाठी व जंगली प्राण्यांसाठी पाणी शिल्लक राहू द्या, असे सांगत प्रेशरबोअरचे काम बंद पाडले म्हणून मंगळवारी सकाळी तहसीलदार कापसे यांनी धरणावर येऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शून्य जलसाठा असल्यालर सुध्दा विहीर बोअर केला जाईलच तुम्ही अडथळा आणून कायदा हातात घेऊ नका नाहीतर कारवाई होईल, असे सांगितले.
परंतु उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासक धस यांना धरणाचे भिंती जवळच विहीर खोदण्याची व त्यात ब्लास्ट करण्यासाठी परवानगी घेतली आहे का ? धरणाच्या भिंतीजवळ स्फोट केल्याने भिंतीला धोका होणार नाही का ? असे प्रश्न विचारुन तुम्हाला कायदे माहीत व लागू नाहीत का ? असे विचारले असता त्यांनी काढता पाय घेतला मात्र विहीरीत बोअर होणारच अशी भूमिका तहसिलदार कापसे यांनी घेतल्याने ग्रामस्थ संतप्त झाल आहे. विहिरीत बोअर केल्यास गुराढोरांसह महिलांचा हंडामोर्चा तहसिल कार्यालयावर नेणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना दिला.
कुर्हाड गावासाठी बिल्दिधरणातुन मंजुर झालेली पाणी पुरवठा योजना सुरू करुन तेथून पाणी घ्यावे. कोकडी ( म्हसाळा) धरणातून पाणी घेतल्यास होणार्या परिणामांना शासन जबाबदार राहील, असे सांगत तहसिलदार कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याने हा प्रकार घडत आहे असे चर्चिले जात आहे. तरी जिल्हाधिकारी व प्रांत साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा व आमच्या पशूधनासह जंगली प्राण्यांचा जीव वाचवावा, अशी मागणी होत आहे.
कुर्हाड गावास बिल्दी धरणाच्या
विहिरीवरून तात्पुरता पाणीपुरवठा
या संदर्भात ‘तरुण भारत’ प्रतिनिधी यांनी पाचोरा तहसीलदार बी.ए.कापसे यांच्याशी संपर्क साधला असता कुर्हाड गावास बिल्दी धरणाच्या विहिरीवरून तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.