नवी दिल्ली : भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने द्विशतकी खेळी केली आहे. या मालिकेतील त्याचे सलग दुसरे द्विशतक आहे. दुसऱ्या सामन्यात देखील कोहली २१३ धावा करत द्विशतकी खेळी केली होती.
विराट कोहलीचे कसोटी सामन्यातील हे सहावे द्विशतक आहे. या द्विशतकी खेळीमुळे तो सचिन तेंडूलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याबरोबरीला येऊन गेला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक द्विशतक करणाऱ्यांमध्ये आता विराट कोहलीची गणना केली जाईल. भविष्यात सचिन तेंडूलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम कोहली मोडू शकेल. त्याचबरोबर द्विशतकाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियासोबत भारतीय संघ लवकरच बरोबरी करू शकेल.
कोहलीच्या या द्विशतकाबरोबरच भारतीय संघाचे तिसऱ्या कसोटीतील पारडे जड झाले आहे. सध्या ५०० धावांवर ४ बळी अशी भारताची धावसंख्या आहे. कोहली २२५ नाबाद आणि रोहित शर्मा ६५ धावांवर नाबाद खेळी खेळत आहेत. मुरली विजयने १५५ धावांची खेळी केली.