पंढरपूरच्या वारीत नक्षलवाद्यांची घुसखोरी! मनीषा कायंदेंचा गंभीर आरोप
02-Jul-2025
Total Views | 24
मुंबई : पंढपूरची आषाढी वारीमध्ये शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव झाला असल्याचा गंभीर आरोप आमदार मनीषा कायंदे यांनी केला आहे. बुधवार, २ जुलै रोजी विधानपरिषदेत पॉईंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून त्या बोलत होत्या.
मनीषा कायंदे म्हणाल्या की, "महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखों वारकऱ्यांचा समावेश असलेली पंढपूरची आषाढी वारी सध्या सुरु आहे. या आषाढी वारीमध्ये देवाला न मानणाऱ्या नास्तिक लोकांचा शिरकाव झाला असून ही अतिशय गंभीर बाब आहे. हे अर्बन नक्षलवादी संविधान दिंडी, पर्यावरण वारी आणि लोकायत यासारख्या वेगवेगळ्या नावाखाली ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन पथनाट्य करतात, भाषणे देतात आणि लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. राज्य सरकार येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे. हे विधेयक अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठी आहे."
"यापूर्वीसुद्धा काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे फेकण्याचा काम केले. बंडातात्या कराडकर यांनीही या प्रकारावर सविस्तर भाष्य केले आहे. तसेच या सर्व प्रकारावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. दोन दिवसांमध्ये आषाढी एकादशी येत असून या प्रकरणावर सरकारने तातडीने गंभीर कारवाई करावी. हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजे. लोकांना देवापासून दूर नेणे किंवा हिंदू धर्मावर आक्रमण करण्याचा प्रकार असून शासनाने याची गंभीर दखल घ्यावी," अशी मागणी त्यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार या प्रकरणावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.