नवी दिल्ली, हिंसा हे मुख्य धोरण असलेल्या नक्षलवादामध्ये प्रांतवाद आणि वर्चस्ववाद ठासून भरलेला आहे. समानता, वर्गसंघर्ष, आणि अन्यायाविरोधात लढ्याच्या गोंडस घोषणा करणारे हे नक्षलवादी प्रत्यक्षात मात्र “आम्हीच श्रेष्ठ” या मानसिकतेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नक्षलवादी आणि त्यांचे शहरी समर्थक सामाजिक एकात्मतेचा लढा लढत असल्याचे स्वप्न दाखवत असतात. मात्र, या हिंसक टोळीचे नेतृत्व करणारे मात्र प्रांतवादाच्या विषाने भरलेले असल्याचे सिद्ध होते. २००५ मध्ये जेव्हा देशभर पसरलेले कट्टरपंथी-डाव्या गट एकत्र आले तेव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) अस्तित्वात आला. भारतात बंदी असलेल्या माओवादी बंडखोर गटातील सीपीआय (माओवादी) पॉलिटब्युरो ही एक उच्चस्तरीय निर्णय घेणारी संस्था आहे. पॉलिटब्युरोचे विश्लेषण केल्यास त्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील नक्षली नेत्यांचाच भरणा असल्याचे दिसते.
दक्षिण आशिया टेररिझम पोर्टलच्या माहितीनुसार, २००४ मध्ये पॉलिटब्युरोमध्ये १६ सदस्य होते. परंतु वसवराजूच्या मृत्यूनंतर हे संख्याबळ फक्त ३ पर्यंत घटले. यामध्ये मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती व मल्लजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू हे दोघे आंध्र-तेलंगणाचेच आहेत. केवळ मिसीर बेसरा झारखंडचा आहे. केंद्रीय समितीतही १८ सदस्य कार्यरत आहेत. त्यातील बहुतेकजण अद्याप लपून आहेत किंवा इतके वृद्ध आहेत की प्रभावी काम करू शकत नाहीत. पोलिसांच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीत असलेले बरेचसे काडरही तेलंगणाचेच आहेत. त्यात बल्लरी प्रसाद राव (करीमनगर), के. रामचंद्र रेड्डी (करीमनगर), मोडेम बालकृष्णा (वारंगल), गणेश उईके (नलगोंडा), सुजाता (महबूबनगर) यांचा समावेश आहे. झारखंडमधून फक्त अनल दा उर्फ पतिराम माझीसारखे मोजकेच नक्षलवादी उच्च पातळीवर पोहोचले आहेत. बस्तरमधूनही केवळ एक नाव महत्त्वाचे ठरते — माडवी हिडमा, जो छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पूवर्ती (जगरगुंडा) गावचा आहे.
बस्तरमध्ये केवळ भरती
• नक्षलवादी बस्तरमधील स्थानिक युवकांना भरती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करते. मात्र त्यांना वरिष्ठ पदे मिळत नाहीत.
• नक्षलवादी वर्गसंघर्षाच्या नावाखाली केवळ संधीसाधूपण व दिशाहीन प्रादेशिक वर्चस्ववाद पसरवते आहे.
• वरिष्ठ नेतृत्व उण्यापुऱ्या मोजक्याच लोकांत मर्यादित असतानाही आंध्र-तेलंगणाचा प्रभाव कमी झाला नाही.
• ‘लाल सलाम’ च्या आडून चाललेला हा टोकाचा प्रादेशिकवाद आणि वर्चस्ववाद विचारधारेतील दुटप्पीपणाचे प्रतीक आहे.