मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने(RPF) “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत हरवलेली किंवा पळून आलेली मुले शोधून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यात, तसेच “ऑपरेशन जीवन रक्षक” अंतर्गत प्रवाशांचे प्राण वाचवण्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. आरपीएफने हरवलेली किंवा पळून गेलेली मुले शोधून त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
घरातील भांडण, कौटुंबिक समस्या, चांगल्या आयुष्याच्या शोधात किंवा शहराच्या झगमगाटामुळे अनेक मुले घरातून निघून रेल्वे स्थानकांवर येतात. प्रशिक्षित आरपीएफ जवान या मुलांशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात व त्यांना पालकांकडे परत जाण्यासाठी समुपदेशन करतात. अनेक पालकांनी या सेवेसाठी मनापासून आभार मानले आहेत. आरपीएफचे जवान रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याबरोबरच प्रवाशांचे प्राण वाचवण्याचे काम सुद्धा तत्परतेने करत असतात. धावत्या गाड्यांमध्ये चढताना किंवा उतरतानाचा धोका अनेक वेळा प्रवाशांच्या दुर्लक्षामुळे वाढतो, अशा प्रसंगी आरपीएफ जवानांनी तत्काळ कृती करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत.
एप्रिल ते मे २०२५ या एक महिन्याच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या रेल्वे पोलीस दलाने आणि सरकारी रेल्वे पोलीस, इतर रेल्वे कर्मचारी व चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने एकूण २३५ मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवले. याआधी २०२४ मध्ये याच कालावधीत १४९मुले वाचवली गेली होती. एप्रिल २०२५मध्ये ११४ मुले व मे २०२५मध्ये १२१ मुले वाचवण्यात आली, तर एप्रिल २०२४ मध्ये ५६ व मे २०२४मध्ये ९३ मुले वाचवली गेली होती. एप्रिल-मे २०२५मध्ये आरपीएफने १२ प्रवाशांचे प्राण वाचवले, यात ९ पुरुष व ३ महिला होत्या. तर याच कालावधीत २०२४मध्ये ७ प्रवाशांचे प्राण वाचवले होते. यात ५ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे.
विभागानुसार आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
विभाग एप्रिल-मे २०२५ एप्रिल-मे २०२४
मुंबई ५३ ५२
भुसावळ ६२ ४५
नागपूर ६१ ३६
पुणे ५१ १०
सोलापूर ०८ ०६
एकूण २३५ १४९