भोपाळ : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा ‘सिंधू नदी पाणीवाटप करार’ रद्द केला. मोदी सरकारने पश्चिम वाहिनी नद्यांचे (झेलम-चिनाब-सिंधू) पाणीसुद्धा अडवले. यामुळे पाकिस्तानची जलकोंडी झाली असली, तरी भारताला या नद्यांचे पाणी अडवणे शय नाही, अशा चर्चा रंगल्या. मात्र, आता सिंधू आणि चिनाब नद्यांचे पाणी राजस्थानमध्ये आणण्यात येणार असून वाळवंट हिरवेगार होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याविषयीची घोषणा केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशमधील पंचवटीमध्ये शनिवार, दि. १४ जून रोजी भाजपच्या तीन दिवसीय प्रशिक्षणवर्गाला भेट दिली. पहिल्या दिवशी खासदार आणि आमदारांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोदी सरकारने पाकिस्तानला ‘सिंधू नदी पाणीवाटप करार’ रद्द केल्यानंतर पुन्हा ‘मास्टरस्ट्रोक’ दिला आहे. राजस्थानमध्ये वाळवंट सातत्याने अधिक्रमण करत आहे. वाढत्या वाळवंटाला थांबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांतून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. सिंधू आणि चिनाब नदीचे पाणी राजस्थानमध्ये आणण्यात येणार असून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे राजस्थान हिरवेगार होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याविषयीची घोषणा केली. तसेच, जलशक्ती मंत्रालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. सूत्रांच्या माहितीनुसार, चिनाब, व्यास आणि सतलज जोडणी कालव्याच्या माध्यमातून हे पाणी राजस्थानकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
तीन वर्षांत पाणी राजस्थानमध्ये पोहोचणार
तीन वर्षांत सिंधू नदीचे पाणी कालव्याच्या माध्यमातून राजस्थानच्या श्रीगंगानगरपर्यंत आणण्यात येणार आहे. त्यामुळे राजस्थानचा मोठा भूभाग सिंचनाखाली येईल. येथील शेतकर्यांना पाणी संकटाचा सामना करावा लागणार नाही. दुसरीकडे पाकिस्तानला मोठा फटका बसणार आहे.
२०० किमी लांब कालवा, १२ कालव्यांचे जाळे
प्राथमिक माहितीनुसार, या योजनेअंतर्गत २०० किमी लांब कालवा आणि १२ जोडणी कालवे तयार करण्यात येतील. त्यामधून पश्चिम वाहिनी नद्यांतील पाणी राजस्थानमध्ये खेळवण्यात येईल.
विशेष म्हणजे कोणत्याही प्रशासकीय अडचणी येऊ नयेत, यासाठी सिंधू नदी खोर्यातील सर्वच नद्यांच्या पाण्याविषयीच्या योजनांना झटपट मंजुरी देण्यात येणार आहे.