...तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते! मंत्री रामदास आठवलेंचं विधान
15-May-2025
Total Views | 18
जालना : देशाच्या विकासासाठी शरद पवार सोबत आले असते तर या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रामदास आठवले म्हणाले की, "शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते आणि एकत्र आहेत. फक्त एनडीएसोबत किंवा महायूतीसोबत जाण्यास हरकत नाही, अशी अजितदादांची भूमिका होती. पवार साहेबांना शिवसेना चालते तर भाजप का नाही? हेच अजितदादांचे म्हणणे होते. देशाच्या फायद्यासाठी राजकारणात निर्णय बदलायचे असतात. नरेंद्र मोदी हे विकासपुरुष आहे. शरद पवार साहेबांसारखा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांद्या लावून या देशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी आमच्यासोबत आले असते तर कदाचित ते या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. अजूनही वेळ गेलेली नाही. आताही शरद पवार साहेब आणि अजित पवार एकत्र आले तर त्यांचा एनडीएला आणि महायूतीला पाठिंबा मिळत असेल तर त्यांचे स्वागतच आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत, असे मला वाटते. जर ते एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल. त्यामुळे त्या दोघांना एकत्रित यायचे असेल तर त्यांनी यावे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा बदल होणार नाही," असेही रामदास आठवले म्हणाले.