मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (AK Bharti warnerd Pakistan) काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'ने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केलेच, तर पाकिस्तानी हवाई दलालाही हादरवून टाकले. सोमवार, दि. १२ मे रोजी तिन्ही लष्कर प्रमुखांनी दिल्ली येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची संपूर्ण माहिती दिली. दरम्यान, भारतीय हवाई दलाचे डीजीएमओ, एअर मार्शल ए.के. भारती यांनी गोस्वामी तुलसीदास यांच्या 'रामचरितमानस' मधील "विनय न मानत जलधि जड़, गए तीन दिन बीत, बोले राम सकोप तब, भय बिनु होय न प्रीति" संदर्भ वाचून दाखवला आणि पाकिस्तानला कडक संदेश दिला.
हे वाचलंत का? : बुद्धिहीन तालिबानींचा फतवा; 'बुद्धिबळ' म्हणजे जुगार
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, "पहलगाम हल्ल्यापर्यंत इस्लामिक दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला होता. त्यामुळे त्यांना अद्दल घडवायची म्हणून आम्ही पूर्ण तयारीने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले केले. भारताची हवाई संरक्षण यंत्रणा भिंतीसारखी मजबूत आहे आणि पाकिस्तानची क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि हवाई हल्ले अयशस्वी झाले."
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "आमची लढाई दहशतवाद्यांशी होती, परंतु पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा देऊन ते आपले युद्ध बनवले. यामुळे झालेल्या नुकसानासाठी ते जबाबदार आहेत." यावेळी, भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही अणुस्थळांना लक्ष्य केलेले नाही, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.