युद्ध आणि शांतता या गोष्टी आपण सहसा राजकारण, रणनीती किंवा इतिहासाशी जोडतो. पण, प्रत्येक संघर्षाच्या मुळाशी आणि प्रत्येक शांततेच्या प्रयत्नामागे असतो एक महत्त्वाचा घटक, मानवी मन. मानसशास्त्रज्ञांनी हे मनोविज्ञान सखोलपणे अभ्यासले असून, माणसाला युद्धाकडे काय ओढते आणि शांततेकडे तो कसा वळतो, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा अभ्यास सांगतो की, आपली विचारशक्ती, भावना आणि सामाजिक वर्तन यांचा अभ्यास केल्याने अधिक शांततामय समाज घडू शकतो. विसंगती वाटेल, पण युद्ध काही लोकांसाठी मानसिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करू शकते. युद्धाच्या काळात माणसाला एक उद्देश किंवा अर्थ मिळाल्यासारखा वाटतो. लोक आपल्या ध्येयासाठी अटीतटीची झुंज देत असल्याची भावना घेतात, ज्यामुळे त्यांच्यात वीर्य आणि धैर्य जागृत होते. शिवाय, बाहेरून धोका असेल, तर लोक अधिक एकत्र येतात, परस्परांमधील विश्वास वाढतो आणि नेतृत्वाला पाठिंबा मिळतो. जरी त्यासाठी मोठी किंमत द्यावी लागत असेल, तरी समाज अधिक एकजूट होतो. एकसुरी होतो.
दुसरीकडे जगातील अनेक महान नेत्यांनी अथक प्रयत्नांनी पुढे आणलेले शांततेचे मानसशास्त्र म्हणजे संघर्ष अहिंसक मार्गाने कसा सोडवावा, याचा अभ्यास. यात समजूतदारपणाचा अभाव, चुकीचे आकलन, भीती आणि अविश्वास कसे वाढतात, हे समजून घेतले जाते. जेव्हा आपण एखाद्याला ‘शत्रू’ असे लेबल लावतो, तेव्हा आपण त्याला कमी दर्जाचा, भयंकर किंवा अमानवी समजू लागतो आणि अशा मानसिकतेमुळे हिंसेला वाट मोकळी होते. शांततेचा विचार करणारे मानसशास्त्रज्ञांचे विश्लेषण हेही सांगते की माध्यमे, भाषणे किंवा नेते कसे भय निर्माण करतात आणि त्यातून संघर्ष कसा वाढतो. याउलट, संवाद, सहानुभूती आणि सहकार्य वापरल्यास द्वेष कमी करता येतो.
खूप प्रयत्न करूनही जगात शांतता टिकत नाही, यामागे अनेक खोलवर कारणे आहेत. मानवाच्या स्वभावातच काही आक्रमक प्रवृत्ती खोलवर रुजलेल्या आहेत. भीती, राग, सूडाची भावना, आणि सत्तेची हाव, यांमुळे अनेकदा संवादाऐवजी संघर्षाची वाट निवडली जाते. अनेकदा राजकीय आणि आर्थिक स्वार्थ, शस्त्र उद्योगांचा प्रभाव आणि सत्ता मिळवण्यासाठी चालणारे डावपेच शांततेच्या प्रयत्नांना खीळ घालतात. शिवाय, जाती, धर्म आणि राष्ट्रभक्तीवर आधारित ओळखींना राजकारणी आणि माध्यमे द्वेष पसरवण्यासाठी वापरतात, ज्यामुळे समाजात ‘आम्ही विरुद्ध ते’ अशी भिंत उभी राहते. ऐतिहासिक जखमा आणि सूडाची साखळीही शांततेस अडथळा ठरते. तसेच, अनेक देशांमध्ये न्यायव्यवस्था, समानता आणि विश्वासार्ह प्रशासन यांचा अभाव असल्याने सामान्य माणसाला वाटते की, त्याला न्याय किंवा हक्क मिळवण्यासाठी हिंसेशिवाय दुसरा पर्यायी मार्ग नाही. शांतता हे केवळ युद्ध टाळण्याचे नाही, तर समतेवर आधारित, दीर्घकालीन बदल घडवणारे मूल्य आहे. जोपर्यंत ही मूल्यव्यवस्था शिक्षण, मनोविकास आणि सामाजिक संस्थांमध्ये रुजवली जात नाही, तोपर्यंत शांततेचे प्रयत्न अपुरे ठरतात.
अनेक संघर्षांमध्ये माध्यमांचा वापर द्वेष, भीती आणि अंधराष्ट्रवाद वाढवण्यासाठी केला जातो. याचा आपल्या सगळ्यांचा अगदी ताजा अनुभव आहेच. शांततेची बाजू मांडणार्या कथा अनेकदा खळबळजनक किंवा सनसनाटी नसतात आणि त्यामुळे त्यांना जनतेचे पुरेसे लक्ष मिळत नाही. युद्धाच्या माध्यमातून राजकारणी आपल्या स्वार्थासाठी जनतेच्या भावना उत्तेजित करतात, त्यामुळे शांततेचे संदेश लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणे नक्कीच कठीण होते. युद्ध आणि संघर्ष यांमागे अनेकदा छुपे स्वार्थ असतात; सत्ता, भूभाग, संसाधने किंवा राजकीय वर्चस्व. शांततेचे कार्यकर्ते मानवी मूल्ये आणि सहवेदना याला साद घालतात, पण निर्णय घेणार्यांचे मार्गदर्शन नैतिकतेपेक्षा रणनीतीवर आधारित असते. शस्त्र उद्योग, राजकीय स्पर्धा आणि सत्तासंघर्ष यांना अस्थिरतेतूनच फायदा मिळतो. या गोष्टी सामान्य जनांना चेतावणार्या असतात. अमेरिकन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी अर्थपूर्ण म्हटले आहे की, “युद्ध कधीकधी अपरिहार्य असू शकते, पण ते कितीही आवश्यक वाटले, तरी ते नेहमीच एक विनाशक गोष्ट असते. आपण एकमेकांच्या मुलांना ठार मारून शांततेने कसे जगावे, हे शिकू शकत नाही.”
या विषयातील अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे शांततेसाठीचा जनतेचा सक्रिय संघर्ष असणे आवश्यक आहे; म्हणजे लोक कसे शांतीसाठी पुढे येतात. क्वीन्सलॅण्ड विद्यापीठातील संशोधनानुसार, लोक तेव्हाच सक्रिय राहतात जेव्हा त्यांना वाटते की, ते एखाद्या अशा मोठ्या समूहाचा भाग आहेत, ज्याचे प्रयत्न जगात काहीतरी विधायक बदल घडवू शकतात आणि त्याचे मूल्यमापन अहिंसा व समतेवर आधारित आहे. अशा अभ्यासातून समजते की, शांतता चळवळी कशा घडतात आणि त्यांना टिकवून ठेवण्यामागे काय शक्ती असते. या क्षेत्रातील एक तज्ज्ञ डॉ. मेलिसा जॉनस्टन यांचे म्हणणे आहे की, शांतता म्हणजे फक्त युद्ध थांबवणे नाही, तर समाजातील खोलवर असलेल्या समस्यांना हात घालणे आवश्यक आहे. संघर्षांचा मुळात विचार करूनच खर्या अर्थाने शांती साधता येते. त्यामुळे ही केवळ तात्पुरती शांती नसून, समाजात मुळापासून सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न असतो.
शेवटी युद्ध आणि शांततेचे मानसशास्त्र आपल्याला सांगते की, संघर्ष आणि समजूत हे सर्व मानवी मनातूनच उगम पावतात. आपण कसे विचार करतो, काय अनुभवतो आणि इतरांशी कसे वागतो, हे समजून घेतल्याने आपण अधिक सुसंवादी आणि शांततामय जग घडवू शकतो. शांतता म्हणजे केवळ युद्धाचा अभाव नाही, ती एक विचारसरणी आहे, जीवनपद्धती आहे आणि परस्परसंबंधांची नवी दिशा आहे. बुद्धांनी जगाला अहिंसा, करुणा आणि शांततेचा संदेश दिला. आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात त्यांच्या शिकवणीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. बुद्ध पौर्णिमा या पर्वानिमित्ताने आपण सर्वांनी जागतिक शांततेचे महत्त्व ओळखून सहअस्तित्व आणि समजूतदारपणाचा मार्ग स्वीकारायला हवा.
डॉ. शुभांगी पारकर