दहशतवादाविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ हेच भारताचे धोरण – पंतप्रधान नरेंद्र मोदी
- ‘ऑपरेशन सिंदूर’चा पराक्रम देशातील माता – भगिनींना समर्पित
- ‘ऑपरेशन सिंदूर’च्या भितीने जगभरात पाकिस्तानची दयेची भीक
- ‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ स्थगित, अण्वस्त्रांची धमकी कचऱ्याच्या डब्यात
- जेथे जेथे दहशतवाद असेल, तेथे तेथे भारताचा तडाखा बसेल
- रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही
- पाकसोबत चर्चा केवळ पीओके आणि दहशतवादावरच – आंतरराष्ट्रीय समुदायासही सुनावले
12-May-2025
Total Views | 21
नवी दिल्ली, दहशतवादाविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ हेच भारताचे धोरण असेल. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, जेथे जेथे दहशतवाद असेल; तेथे तेथे त्याच्या मुळावर असाच घाव घातला जाईल. पाकिस्तानसोबच चर्चा केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच होईल असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रास संबोधित करून ‘ऑपरेशन सिंदूर’चा पराक्रम देशातील माता – भगिनींना समर्पित केला.
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारतीय सैन्यदलांना पराक्रम गाजवून पाकला गुडघ्यांवर आणल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री ८ वाजता राष्ट्रास संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, गेल्या काही दिवसांत भारताची ताकद आणि संयम संपूण जगाने बघितला आहे. भारताचे बलाढ्य सैन्य, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तचर संस्थांना, आपल्या शास्त्रज्ञांना देशवासियांतर्फे अभिवादन 'ऑपरेशन सिंदूर' चे ध्येय साध्य करण्यासाठी भारताच्या शूर सैनिकांनी अपार धैर्य दाखवले. त्यांचे शौर्य, त्यांचे धाडस आणि पराक्रम आपण देशाच्या प्रत्येक आईला, देशाच्या प्रत्येक बहिणीला आणि देशाच्या प्रत्येक मुलीला समर्पित करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकने संपूर्ण जगभरात दयेची भीक मागितल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताच्या जबरदस्त तडाख्यानंतर पाकिस्तानी सैन्याने आपल्या डीजीएमओशी संपर्क साधला. तोपर्यंत भारतीय सैन्याने मोठ्या प्रमाणात दहशतवादाचे पायाभूत सुविधा नष्ट केल्या होत्या, दहशतवादी मारले गेले होते, पाकच्या मध्यभागी असलेल्या दहशतवादी तळांना उध्वस्त केले होते. त्यामुळे पाकची विनंती आणि पुन्हा दहशतवादी कारवाया आणि लष्करी धाडस होणार नसल्याचे सांगितल्यावर भारतानेही त्यावर विचार केला. मात्र, भारताने पाकमधील दहशतवादी आणि लष्करी आस्थापनांविरुद्धची प्रत्युत्तरात्मक कारवाई संपवली नसून केवळ स्थगित केली आहे. येत्या काळात, भारत पाकच्या प्रत्येक पावलाचे मोजमाप करणार असून असून आवश्यकता वाटल्यास पुन्हा अशाच प्रकारची भयानक कारवाई केली जाईल, याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.
'ऑपरेशन सिंदूर' हे फक्त एक नाव नाही तर ते देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर' ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजी रात्री उशिरा आणि ७ मे रोजी पहाटे, संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेचे फलितात रूपांतर झालेले पाहिले आहे. भारतीय सैन्याने पाकमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ला केला. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल, याची दहशतवाद्यांनी आणि त्यांच्या आकांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. जेव्हा भारताच्या क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला, तेव्हा दहशतवादी संघटनांच्या केवळ इमारतीच नव्हे तर मनोबलही उध्वस्त झाले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्याचप्रमाणे पाकला गर्व असणाऱ्या त्यांच्या लष्करी आणि हवाईदलाच्या तळांवरही भारताने अचुक हल्ले करून त्यांचे कंबरडे मोडल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
हे आहे आता भारताचे ‘न्यू नॉर्मल’ – पंतप्रधानांनी जगाला ठणकावले
सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक नवीन रेषा आखून न्यू नॉर्मल स्थापित केल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली.
पहिले - जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. भारत आपल्या पद्धतीने, आपल्या स्वतःच्या अटींवर प्रतिसाद देईल. दहशतवादाची मुळे जेथे जिथे उगम पावतील, तेथे भारत कठोर कारवाई करणार.
दुसरे - भारत कोणताही आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही. अणुब्लॅकमेलच्या आडून वाढणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांवर भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल.
तिसरे - भारत दहशतवादाला आश्रय देणारे सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार यांना वेगळे घटक म्हणून पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने पुन्हा एकदा पाकचे सत्य पाहिले आहे. पाकिस्तानी सैन्याचे उच्च अधिकारी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात गर्दी करत होते. हा राज्य पुरस्कृत दहशतवादाचा मोठा पुरावा आहे. भारताचे आणि आमच्या नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी आम्ही निर्णायक पावले उचलत राहणार आहे.
पाकसोबत चर्चा फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच – जागतिक श्रेयवादी घटकांनाही चपराक
भारत – पाक संघर्ष थांबविण्याचा दावा करणाऱ्या जागतिक श्रेयवादी घटकांनाही पंतप्रधानांनी योग्य संदेश दिला आहे. ते म्हणाले, आपण जागतिक समुदायाला हे देखील सांगू इच्छितो की, जर पाकशी चर्चा झाली तर ती फक्त दहशतवादावरच होईल; हे भारताचे घोषित धोरण आहे. जर पाकशी चर्चा झाली तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके आणि दहशतवादावरच होईल.
‘मेड इन इंडिया’ युद्धसामग्री हेच जगाचे भविष्य
भारताने युद्धभूमीवर प्रत्येक वेळी पाकला पराभूत केले आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरने एक नवीन आयाम जोडला आहे. भारताने वाळवंट आणि पर्वतांमध्ये आपली क्षमता दाखवली आणि नवीन युगातील युद्धातही आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. या कारवाईदरम्यान भारताच्या ‘मेड इन इंडिया’ शस्त्रांची सत्यता सिद्ध झाली. एकविसाव्या शतकातील युद्धात ‘मेड इन इंडिया’ संरक्षण उपकरणे हेच भविष्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
एका झटक्यात १०० दहशतवादी ठार
भारताने केलेल्या या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक भयानक दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या अडीच ते तीन दशकांपासून पाकमध्ये मुक्तपणे फिरत असलेले आणि भारताविरुद्ध कट रचणारे अनेक दहशतवादी सूत्रधार भारताने एका झटक्यात संपवले.