पाकिस्तानकडून हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर, हवाई तळांना लक्ष्य; कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

    10-May-2025   
Total Views |
 

pakistan attacks on hospitals and schools in india colonel sophia qureshi gave information
 
नवी दिल्ली : (India-Pakistan Updates) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून केलेल्या या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तान सातत्याने भारतातील शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले सुरू असून काल रात्री त्यांनी उधमपूर, पठाणकोट आणि भटिंडा येथील भारतीय हवाई तळांवर हल्ले केले, अशी माहिती आज शनिवार, दि. १० मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच पाकिस्तानने काल भारतातील काही रुग्णालये आणि शाळांवर हल्ले केल्याची माहिती भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे.
 
हवाई तळांना लक्ष्य, शाळा-रुग्णालयांवरही हल्ले
 
आज परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग उपस्थित होत्या. यावेळी बोलताना कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, "पाकिस्तानी सैन्य पश्चिम सीमेवर सतत हल्ले करत आहे. त्यांनी भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला आहे. भारताने त्यांचे अनेक हल्ले निष्प्रभ केले आहेत. परंतु पाकिस्तानने २६ हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे उधमपूर, भूज, पठाणकोट, भटिंडा येथील हवाई दलाच्या तळांवर भारताची उपकरणे आणि जवानांना फटका बसला आहे. त्यांनी पहाटे १:४० वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला. याचबरोबर पाकिस्तानने भारतातील आरोग्य सुविधा आणि शाळांवरही हल्ला केला"
 
 
 
सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण सैन्याने त्याला जोरदार प्रत्युत्तर देत हल्ला मोडून काढला. प्रत्युत्तरात, भारताने पाकिस्तानी बाजूने केलेल्या या चिथावणी आणि वाढत्या गैरप्रकारांचा जबाबदार पद्धतीने बचाव केला आहे आणि प्रत्युत्तर दिले आहे. आज सकाळी पुन्हा पाकिस्तानकडून उत्तेजक आणि चिथावणीखोर पद्धतीची पुनरावृत्ती दिसली, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटलं आहे.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\