मुंबई : सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात किंचित घसरण दिसून आली. अवघ्या ७ अंशांची घसरण होत बाजार ७४,३३२ अंशांवर थांबला. याउलट निफ्टीमध्ये मात्र ७ अंशांची वाढ दिसून येत, निर्देशांक २२,५५२ अंशांवर थांबला. यामुळे आठवड्याच्या शेवटी शेअर बाजाराने चढ –उतारांची स्थिती कायम ठेवली आहे असे दिसते.
रिलायन्स इंडस्ट्रीजला शुक्रवारी बाजारात सर्वात जास्त कमाई करता आली. त्या पाठोपाठ टाटा मोटर्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदाल्को, बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ झाली. या सर्वात क्षेत्रांमध्ये बघायचं तर ऑटो सेक्टर, सरकारी बँक, धातू उत्पादने, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रांमध्ये वाढ झाली. एकूणच बाजारात या आठवड्यात सातत्याने होत असलेल्या घसरणीला चाप बसल्याने गुंतवणुकदार सुखावले.