मुंबई : आम्ही अनेक बॅगा मातोश्रीवर पोहोचवल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय राऊतांनी एक व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
संजय शिरसाट म्हणाले की, "कोणत्याही नेत्याकडे कधीही आपल्यासोबत कपड्याच्या एक दोन बॅग असतात. काहीतरी आरोप करुन संजय राऊतांनी नवीन जावईशोध लावला आहे. पैशाच्या पावसाने कधीही निवडणूक जिंकता येत नाही. अन्यथा माझ्यासारखा सामान्य माणूस आमदारच झाला नसता. परंतू, पराभव दिसू लागल्याने आता आपल्या महाविकास आघाडीचं काही खरं नाही असं त्यांना वाटत आहे. त्यामुळे ते हरण्यामागची कारणं आतापासूनच लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "तुम्ही कॅमेरा लावून बसले होतात तर बॅग उघडून का पाहिल्या नाहीत? एवढी सगळी यंत्रणा असताना अशा पैशाच्या बॅगा आणल्या जात नाहीत. आम्ही जसे तुमच्या मातोश्रीवर गपचूप खोके पाठवले तसे पोहोचवावे लागतात. तिथून ते खोके कुठे पाठवायचे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.