मविआचं जागावाटप ठरलं! कोण कुठे लढणार? वाचा सविस्तर...
09-Apr-2024
Total Views | 365
)
मुंबई : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अखेर महाविकास आघाडीचं (मविआ) जागावाटप निश्चित झालेलं आहे. मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी या तिन्ही पक्षांच्या जागांची घोषणा करण्यात आली. दरम्यान, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोण कुठे लढणार हे जाणून घेऊया...
काँग्रेस
नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई या १७ जागांवर काँग्रेस लढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड या १० जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट लढणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या २१ जागा शिवसेना लढणार आहे.
उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ही जागावाटपाची यादी वाचून दाखवली असून उबाठा २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० जागांवर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या जागांचे वाटप हे अत्यंत खेळीमेळीत आणि सहजरित्या झालेलं असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सांगलीच्या जागेचा तिढाली सुटला आहे. या जागेवर काँग्रेस आणि उबाठा गटाकडून दावा करण्यात येत होता. मात्र, आता याठिकाणी उबाठा गटाचाच उमेदवार लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच भिवंडीची जागा ही शरद पवार गट लढवणार आहे.