आचारसंहितेच्या कालावधीत राज्यात १८७ कोटींची मालमत्ता जप्त
30-Oct-2024
Total Views |
मुंबई - Election commission news : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून बुधवार, दि. ३० ऑक्टोबरपर्यंत राज्यात १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातूंचा त्यात समावेश असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये,
इन्कमटॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.