मुंबई : "स्वतःला शंकराचार्य म्हणवणाऱ्या अविमुक्तेश्वरानंद सारख्या खोट्या साधूबाबा पासून सावध राहा. महाराष्ट्राची संस्कृती, राज्यातील विविध संप्रदाय आणि धर्माचा नाश करण्याच्या उद्देशाने हा संन्यासी बनून फिरतो आहे", असा गंभीर आरोप स्वामी श्री गोविंदानंद सरस्वती यांनी मंगळवारी केला. स्वामी श्री गोविंदानंद सरस्वती हे पूज्यपाद बद्री ज्योतिर्मठ, द्वारका शारदा पीठ जगद्गुरू शंकराचार्य ब्रह्मलीन स्वामी स्वरूपानंद सरस्वती जी महाराज यांचे दण्डी संन्यास दीक्षित शिष्य आहेत. प्रेस क्लब, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद लवकरच मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोविंदानंद सरस्वती यांनी अशा खोट्या साधूबाबाच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन मुंबईकरांना केलेय. त्यांनी अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरोधात आरोप केले की, अविमुकेश्वरानंद विरुद्ध अवमानाचा खटला दाखल करण्यात आलाय, त्यांचे अखिल भारतीय आखाड्याचे अध्यक्षपद सुद्धा नाकारण्यात आलेय, साधू-संतांनी त्यांना महाकुंभातून बाहेर काढले. गंभीर म्हणजे, अविमुक्तेश्वरानंद हे ७० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर बाहेर असून त्यांच्याविरोधात वाराणसी उच्च न्यायालयात खटला सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. सर्व धार्मिक परिषदांनी अविमुक्तेश्वरानंदांना नाकारले असून समाजानेही सावध व्हावे, असे आवाहन गोविंदानंद सरस्वती यांनी केले.
जगद्गुरू शंकराचार्य ज्योतिष एवं द्वारकाशारदापीठाधीश्वर स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती यांनी यापूर्वी म्हटले होते की, 'आत्तापर्यंत आम्ही अधिकृतपणे ज्योतिष पीठ आणि द्वारका शारदा पीठ या दोन्ही पीठांवर उत्तराधिकारी आणि शंकराचार्य म्हणून कोणालाही घोषित केलेले नाही. जर कोणी स्वतःला शंकराचार्य म्हणवत असेल तर हे त्याचे वैयक्तिक मत आहे.' याबाबत सुद्धा गोविंदानंद सरस्वती यांनी खुलासा केला.
रामायणाचा उल्लेख करत श्री गोविंदानंद सरस्वती म्हणाले, रावणाने ज्याप्रमाणे मारीच राक्षसाला पाठवले होते, त्याप्रमाणे झाकीर नाईक सारखी माणसे अशा खोट्या साधूंना सन्यासी म्हणून समाजात पाठवत आहेत आणि हेच लोक सनातन धर्माला ठेच पोहोचवू पाहतायत. अविमुक्तेश्वरानंद त्यापैकी एक असून ते कुराणशी प्रेरित असल्याचा आरोप गोविंदानंद सरस्वती यांनी यावेळी केला.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद दोन महिने मुंबई प्रवासावर असून केवळ पैसे लुटण्याचा त्यांचा उद्देश आहे. अशा खोट्या साधूच्या पाठीशी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे स्वतःला शंकराचार्य म्हणून मिरवणाऱ्या अविमुक्तेश्वरानंदांना तात्काळ अटक व्हायला हवी, असे आवाहन गोविंदानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले.