समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे २६ मे रोजी उद्घाटन
शिर्डी ते नाशिक टप्पा वाहतुकीसाठी होणार खुला
23-May-2023
Total Views | 58
मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थकारणाला कलाटणी देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीच्या दरम्यान बांधण्यात आलेल्या रस्त्याचे उदघाटन करण्यात आले होते. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या मार्गावर प्रवास करून प्रकल्पाचे काम दर्जेदार झाल्याचा पुरावा दिला होता. याच महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन शुक्रवार, दि. २६ मे रोजी होणार असून नागपूर ते भरवीर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
शुक्रवार, दि. २६ मे रोजी शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. शिर्डी ते भरवीर हा टप्पा सुरु झाल्यानंतर या दोन ठिकाणांमधील अंतर अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पार करता येणार आहे. या ट्प्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर नागपूरहून नाशिकपर्यंतचे अंतर केवळ सहा तासात कापता येणार आहे.
मुंबई ते नागपूर दरम्यानचा ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५०१ किमीचा टप्पा सुरू झाला आहे. तर शिर्डी ते भरवीरपर्यंतचे ८० किमी महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे. मुंबई ते भरवीर या उर्वरित २०० किलोमीटरच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे.