पुणे : आपल्याकडून लोकांची आशा आहे. आपण बदलाचे साधन आहोत. त्यामुळे आत्मचिंतन करतानाच लोकांच्या आशा आणि आकांक्षां पूर्ण कराव्या लागतील. याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सेवाभाव, संतुलन, संयम, समन्वय, सकारात्मकता, संवेदनशीलता आणि संवाद या सात सूत्रांवर कार्यकर्त्यांनी काम करावे. संवाद ही भाजपाच्या कार्यकर्त्याची ही ओळख आहे. पक्ष मोठा होत असताना आपला व्यक्तीगत सहयोग किती आहे याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. आपण राजनैतिक प्राणी आहोत. पुन्हा सत्ता आणण्याकरिता आपल्याला पॉलिटीकल अजेंडा सेट करावा लागेल असे त्यांनी सांगितले.
पुण्यात पार पडलेल्या भाजपा प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्रिय व राज्यातील मंत्रीगण, आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा संघटनमंत्र देताना कार्यकर्ता कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भाजपाचा कार्यकर्ता हा उद्धट, ऐकून न घेणारा असू नये. फक्त स्वत:चीच मते मांडून निघून जणारा कार्यकर्ता असू शकत नाही. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला परिवर्तनाचे माध्यम बनावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सातही सूत्रांना सोबत घेऊन चालावे लागेल. पक्षाच्या वाढीत आणि विजयात आपले व्यक्तीगत योगदान किती आहे याचे भान ठेवावे. सर्व जग एक झाले तरीही आम्हीच जिंकू ही ताकद निर्माण करावी लागेल. त्यासाठी योजना तयार करा. प्रत्येक सक्रीय कार्यकर्त्याने पुढील वर्षीपर्यंत विविध समाज, जाती, महिला, युवा यामधील दहा कार्यकर्ते जोडावेत. भाजपाच्या आजच्या यशासाठी यापूर्वीच्या चार पिढ्या खपल्या आहेत. त्याची जाणिव मनात ठेवा.
पंतप्रधानांच्या तर्कशुद्ध मांडणीला छेद देऊ शकत नसल्याने विरोधी पक्ष उद्विग्न असून त्यांची चिडचिड होते आहे. भारत आज जगात स्वत:चे स्थान निर्माण करुन उभा आहे आणि मोदीजी एक व्यक्तीमत्वाच्या रुपात जगात उभे आहेत. शेजारी राष्ट्रांशी पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यात यश आले आहे. 2014 नंतर भारताचे आंतरराष्ट्रीय स्थान बदलले आहे. अमेरिका आणि युरोपीय राष्ट्र आपल्याकडे जगातल्या पहिल्या पाचातील मोठी अर्थव्यवस्था म्हणून पाहू लागले आहेत.