मुंबई : लोकमान्य टिळकांचे कार्य आणि त्यांची आठवण सदैव लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी पार्ल्यातील सामान्य नागरिकांकडून लोकमान्य सेवा संघाची स्थापना करण्यात आली. अनेक अडचणींवर मात करत आणि लोकवर्गणीतून उभारणी झालेल्या संस्थेच्या शतकपूर्तीचे पूर्णतः श्रेय हे सामान्य नागरिकांनी केलेल्या असामान्य कार्याला जाते, असे विचार लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी 'शतकस्वर' या सोहळ्यावेळी मांडले.
लोकमान्य सेवा संघाच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त पार्ल्यामध्ये 'शतकस्वर' या संगीतमय सोहळ्याची सुरवात शनिवार ११ मार्च रोजी करण्यात आले. धावती ल स्वा. सावरकर पटांगणात हा सोहळा पार पडला. दरम्यान यावेळी संगीत व कलाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावल्याचे पाहण्यास मिळाले. कौशल इनामदार आणि दीपक करंजीकर यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याची निर्मिती करण्यात आली.
दिनांक १० मार्च ते दिनांक २२ मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन लोकमान्य सेवा संघाकडून करण्यात आले आहे. तसेच शनिवारी झालेल्या कार्क्रमात १९२९ मध्ये जी एन जोशी यांनी लोकप्रिय केलेल्या, ना घ देशपांडे रचित 'रानारानात गेली बाई शीळ' या पहिल्या भावगीतापासून सलिल कुलकर्णी यांच्या गाण्यांपर्यंतची वैशिष्टयपूर्ण गाणी निवडली होती. त्याचबरोबर संस्थेच्या निर्मितीमागची प्रेरणा, लोकसहभागातून झालेली उत्स्फूर्त उभारणी, संस्थेचे मूळ आधारस्तंभ, निरनिराळ्या शाखांचा विस्तार अशा सगळ्याचा रंजक आढावा घेण्यात आला.