पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरी॥
संता संगे सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ॥
अशी ही पंढरीची वारी आता केवळ ‘लोकल’ नसून ‘ग्लोबल’ झाली आहे. या वारीत अलीकडच्या काळात आध्यात्मिक उद्बोधनासोबत सामाजिक प्रबोधन घडत आहे. गेली १२ वर्षे या पंढरीच्या वारीत महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग तसेच ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांच्या विद्यमाने आणि ‘महाराष्ट्र कला संस्कृती मंच’ यांच्या संयोजनाने ’पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू आहे.
ग्रामस्वच्छता दिंडी, आरोग्य दिंडी, सामाजिक समता दिंडी, सांस्कृतिक संवाद दिंडी, संत कवयित्री महादिंडी, अशा स्वरूपाचे चित्ररथ वारीमध्ये पाहायला मिळतात. या उपक्रमाद्वारे पर्यावरण जागृतीचा संदेश तसेच प्रदूषण मुक्तीचा संदेश वारीमध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात लोककलावंतांमार्फत दिला जातो.
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण विभाग- महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने निघालेल्या वारीचे संयोजन ‘महाराष्ट्र कला संस्कृती मंच’ संस्था करीत आहे. संतांच्या भारूडांमध्ये अध्यात्मिक उद्बोधनासोबतच सामाजिक प्रबोधनही सांगितलेले आहे. ’विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ॥’ असे संतांनी म्हटले आहे. ’उच नीच काही नेणे भगवंत’ असेही संत म्हणतात. हा सामाजिक समतेचा संदेश वारीमध्ये दिला जातो. तसेच, पर्यावरण जागृतीचा संदेश देताना लोककलावंत संतांच्या रुपकाश्रयी अभंगांचा चपखलपणे वापर करतात.
या वारीबद्दल मत व्यक्त करताना ८६ नंबर दिंडी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या दिंडीचे मालक ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे म्हणतात, “पर्यावरण जागृतीचा संदेश केवळ आजच्या काळातला नाही, तर तो ज्ञानोबा-तुकोबांच्या काळातला आहे. कारण, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे - नगरेचि रचावी जलाशये निर्माण व्हावी महावने लावावी नानाविध.” हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे वारकरी कीर्तनकार यांच्या कीर्तनाची शैली गाडगे महाराज कीर्तन शैलीसारखे असते. या कीर्तनात ते स्वरचित जात्यावरच्या ओव्या सादर करतात आणि त्यातून पर्यावरणाचा संदेश देतात.
भारुड सम्राज्ञी संगीत नाटक अकादमी विजेत्या चंदाबाई तिवाडी आपल्या भजनातून भारुडातून पर्यावरण जागृतीचा संदेश देतात तो असा.
पर्यावरणाची दिंडी भजन
ज्ञानोबा माऊली तुकाराम॥
ज्ञानोबा माऊली। ज्ञानोबा माऊली॥
भूमीला मिळू दे झाडांची साउली॥
वसुंधरा वाचवा हो। ही धरणी वाचवा॥
ज्ञानोबा माऊली तुकाराम॥२॥
भारुड कारभारी या दिंडीला जायचं॥
पर्यावरणाच्या वारीला जायचं॥
खूप दिवस झाले कुठे यात्रा नाही
माहेरी नाहीस दोन वर्षे झाली
अहो घरातच बसलो
मला माहेरची आठवण येते
कारण माझ्यामाहेरचं वैभव॥
माझ्या माहेराची ओढ। काय सांगू तुम्हा बाई।
गाव वेशीच या वड माझा बाप वाट पाही॥१॥
माझ्या अंगणात याहो। फुलल्याहो जाई जुई।
घाली मायेची पाखर। मायाळू हो माझी आई॥२
याहो प्रेमाचेहे वारे। वाहतसे झुळ झुळ। माझा थोरला चुलता। त्या हो दारीचा पिंपळ॥३॥
माझी बहिण धाकुली। याहो नांदूरकीच जाळ।
जशी न्हायला बसली। केस सोडोनी मोकळं॥४॥
तिथं परसात बाई गोड पाण्याचं ग आड।
माझा धाकला तो बंधू। उभं लिंबाच ते झाड॥५॥
हे पंच प्राणजपणारे पाच झाडे आता। पर्यावरणाच्या वारीला जाताना आपण लावली पाहिजे म्हणून वारीला जाऊ.
वारीच्या अध्यात्मिक उद्बोधनासोबत सामाजिक प्रबोधनाचा विचार करता असे लक्षात येते. स्थानीय वारी आता जागतिक पातळीवर गेलेली आहे. प्रचार-प्रसाराची माध्यमे बदललेली आहेत, त्यामुळे वारीच्या पारंपरिक स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल होत आहे.
‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ हा उपक्रम निश्चितच पथदर्शी आणि पर्यावरण जागृतीला चालना देणारा आहे. पंढरीच्या वारीमध्ये विश्वबंधुत्वाला कवेत घेण्याचे सामर्थ्य आहे. ’उठा उठी अभिमान। जाय ऐसे स्थळ कोण॥ ते या पंढरीशी घडे। खळा पाझर रोकडे॥ अशी ही पंढरीची वारी अवघ्या महाराष्ट्राचे सुख निधान झाली आहे.