अभ्यंगावरील लेखमालेनंतर एका नवीन विषयाकडे वळूया. हा विषय काळानुरूप अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा आहे. मनुष्य प्राण्याचे चार पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म-अर्थ आणि काम याच्या उचित वापराने मोक्षप्राप्तीकडे वाटचाल करणे हेच प्रयोजन आहे. एकविसाव्या शतकात पदार्पण करताना अर्थ, धन, संपत्ती याबद्दल अधिक लालसा उत्पन्न झाली आहे. विविध व्यवसायांचा विचार करतेवेळी, त्यातून किती मिळकत मिळेल? याचा विचार सर्वप्रथम होतो. या लेखमालेतून विविध व्यवसायांतील व्यक्तींना त्या त्या व्यवसायामुळे होणाऱ्या व्याधी (occupational hazards) हा विषय मांडणार आहे. नुकतीच गुरूपौर्णिमा होऊन गेली. गुरू हा फक्त आध्यात्मिक गुरू नाही, तर कलाशाखेतही आणि अभ्यासातही जे मनोभावे, शिस्तीने मार्ग दाखवतात, ते ही सर्व गुरूच होत. पण, शाळेतील शिक्षक व कॉलेजमधील प्राध्यापकांनीही विद्यार्थी गुरूचा मान देतातच असे नाही. आजच्या लेखामधून शिक्षकांना होणारे शिक्षण व्यवसायामुळे आजार (occupatiuoonal hazards in teachers) या बद्दल जाणून घेऊया.
शालेय शिक्षकांची संख्या महाविद्यालयीन शिक्षकांपेक्षा अधिक असते. भारतातील सामान्य शाळांचा जर पट बघितला, तर एका वर्गात ६०-८० इतके विद्यार्थी असतात. शिशुवर्गांमधून तर तान्हुल्यांचा आरडाओरडाही अधिक असतो. सर्व मुले एकाच बुद्धिमत्तेची नसतात. त्यामुळे एकच मुद्दा विविध प्रकाराने व पद्धतीने समजवावा लागतो. मुलांना शिकवताना तक्ते बनवावे लागतात, युक्ती लावून गाणी बनवून कठीण विषय सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करावा लागतो. शिकविणे, पेपर काढणे, गृहपाठ तपासणे, पेपर तपासणे यावरच काम संपत नाही, तर याबरोबरच सहलीला नेणे, स्नेहसंमेलनाचे नाटक/ नृत्य बसविणे इत्यादीही कामे असतात आणि आता तर सरकारी मतदान, जनगणना इ. कार्यक्रमांमध्येदेखील शिक्षकांना सक्तीचा सहभाग घ्यावा लागतो. दिसायला तशी शिक्षकांची नोकरी उत्तम, भरपूर सुट्ट्या आणि अर्ध्या दिवसाचे काम; पण खरे बघता अर्धा दिवस काम आणि सुट्ट्या या सर्व विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांना नाही. कारण, त्यांचे काम त्याही पलीकडचे असते.
शिक्षकांना शिक्षण व्यवसायामुळे काही शारीरिक त्रास तर होणारच; त्याचबरोबर काही मानसिक तक्रारी पण उद्भवतात. त्याबद्दल सविस्तर बघूया. शिक्षकांना फळ्यावर खडूने लिहावे लागते. मोठा वर्ग असल्यास गोंधळ असल्यास ओरडून बोलावे लागते. न ऐकणाऱ्या मुलांबरोबर शिस्तीने वागावे लागते. त्यांना शिक्षा करावी लागते. शिकवताना बहुतांशी शिक्षक उभ्यानेच शिकवतात. शिकविण्यापूर्वी तो विषय अभ्यासून त्यावर स्वत:च्या टिप्पण्या काढून तयारीनिशी यावे लागते. शाळेत शिकवताना बाहेरील प्रकाश व हवेशी संपर्क तसा कमी येतो. बंदिस्त वातावरणात अधिक वेळ घालवला जातो. तास सुरू असताना, वर्ग घेत असताना, तहान-भूक लागली असल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे लागते. मल-मूत्र आवेग आले असल्यास ते रोखावे लागतात. लहान वयातील विद्यार्थ्यांना कायम काही ना काही आजार होत असतो. सर्दी, खोकला, ताप, टॉनसिल्सस वाढणे, जंत होणे इ. झालेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात कायम राहावे लागते. काही वेळेस शाळेची वास्तू ही दुरुस्ती करण्यालायक झालेली असते. स्वच्छता व दुर्गंधीरहीत वातावरण काही वेळेस नसते आणि त्यात परीक्षेचा ताण. या सगळ्याचा हळूहळू परिणाम शिक्षकांच्या आरोग्यावर होताना दिसतो. ओरडून बोलावे लागत असल्यामुळे स्वरयंत्रावर जोर पडतो, ताण येतो. आवाज बदलतो, घोगरा होतो, आवाज बसतो. क्वचित स्वरयंत्रावर जर अधिक ताण पडला, तर बोलणे बंद होऊ शकते. हे टाळण्यासाठी सतत ओरडून बोलू नये. गरम पाणी प्यावे. जेष्ठमध चघळावा, कंकाळ खावा. रोज थोडे तूप प्यावे.
खडूच्या धुळीमुळे शिक्षकांना अॅलर्जी होऊ शकते. अॅलर्जी निर्माण होऊन वारंवार सर्दी- खोकला होऊ शकतो. काही वेळेस ही अॅलर्जी इतकी वाढते की, दम लागण्याचा त्रास सुरू होतो. हे टाळण्यासाठी रोज नस्य करावे. तिळतेल, खोबरेल तेल किंवा गाईचे तूप सकाळी आणि सायंकाळी २ -२ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये घालावे. शाळेत जाण्यापूर्वी नाकाला आतल्या विवरात खोबरेल तेल लावावे. गरम पाण्यात तेल, तूप घालून हळद घालून गुळण्या कराव्यात. यामुळे हे धुळीकण नाकातील तेलाच्या वंगणाला चिकटतात आणि शरीराच्या आत प्रवेशित होत नाहीत. फळ्यावर खडूने लिहिताना व फळा पुसताना नाका-तोंडावर सुती रुमाल धरावा.
बरेचसे शिक्षक उभ्याने शिकवतात, याचा परिणाम म्हणजे पाय दुखणे, पोटऱ्या दुखणे, कंबर दुखणे अशी सुरूवात होते. वजन अधिक असल्यास पाय सुजतात. बरीच वर्षे असेच सुरू राहिल्यास पायाच्या शिरा ताठरतात varicose vens दिसू लागतात. हे टाळण्यासाठी सतत उभे राहून शिकवू नये. बसल्यावरही पाय लोंबते ठेवू नये. पायाखाली स्टूल घ्यावे. रोज सकाळी आंघोळीपूर्वी आणि झोपताना अंगाला तेल लावावे. अभ्यंग करावे. संपूर्ण अंगाला जर रोज जमत नसेल, तर किमान पाय व डोकंही यांना चोळावे varicose होऊ नयेत म्हणून पाय थोडे झोपताना उंचवून ठेवावेत. पायाखाली उशी/लोड घ्यावा.
विद्यार्थ्यांपासून होणारे संसर्ग
सर्दी, खोकला, कानदुखी, डोळे येणे, नाक वाहणे, जुलाब होणे इ. पासून शिक्षकांनी आपली काळजी घ्यावी. प्रतिकारक्षमता उत्तम असल्यास आजार/रोगराई फिरकत नाही. रोज व्यायाम (सूर्यनमस्कार, प्राणायम, चालणे व तत्सम) करावा. पौष्टिक अन्न खावे. भूक लागल्यावर जेवावे. अतिखाणे टाळावे, तसेच उपाशीदेखील वारंवार राहू नये. मूत्रप्रवृत्तीचा वेग (संवेदना) आला की, मूत्र विसर्जन करावे. ते रोखून धरू नये. जर असे वारंवार रोखले गेले, तर मूत्रमार्गातील संसर्ग, मूतखडा इत्यादींचा त्रास होऊ शकतो. तसेच शौचविधीची संवेदना असल्यास मलविसर्जन करावे नाहीतर मलाचे खडे होणे, मलबद्धता, पोट फुगणे- दुखणे अशी लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. भूकेची वेळ वारंवार टाळली, तर पित्त वाढून आम्लपित्त किंवा अन्य त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे नियमितता पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
मानसिक ताणामुळेही शिक्षकांना विविध तक्रारी होताना दिसतात. मान दुखणे, डोळे दुखणे, चक्कर, पॅनिक अटॅक, छातीत धडधडणे अशी लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. चिडचिड वाढणे, चंचलता वाढणे, ताणतणाव जाणवणे, न्यूनगंड उत्पन्न होणे अशी लक्षणे वाढू शकतात. कामात चुका होऊ लागतात. अतिकामाच्या दबावामुळे अपुरी झोप होणे, खंडीत-तुटक झोप लागणे, दचकून उठणे इ. प्रकार होऊ शकते. या गोष्टी सहजपणे टाळता येऊ शकतात. मानसिक ताण येऊ न देणे महत्त्वाचे आहे. शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता रोज थोडे थोडे काम करत राहवे. इतर शिक्षकांशी मैत्रीचे नाते प्रस्थापित करावे. Healthy conpition चांगली, पण वरचढपणा करू नये. Healthy work place असल्यास नवनवीन कल्पना युक्त्या सूचतात. खेळीमेळीचे वातावरण असल्याने निम्मा ताण तिथेच संपतो. ताण कमी होण्यासाठी आपापसात संवाद असणे उपयोगी ठरते. एखादा छंद जोपासावा. चित्रकला, संगीत, वाचन यात ताण कमी करण्याची क्षमता आहे. यामध्ये मन शांत करून पुन्हा नव्या उमेदीने कामात समरस व्हावे.
हल्ली शाळांमधून विद्यार्थ्यांना मारणे, त्यांच्यावर हात उगारणे बंद केले आहे. पण, काही मस्तीखोर मुले, अन्य विद्यार्थ्यांना त्रास देतात, मारामारी करतात. अशावेळेस शिक्षकांना मध्यस्थी करावीच लागते. जर ते मूल खूप मस्तीखोर असेल, तर शिक्षकांनाच उलट बोलणे, धमकी देणे इ.गोष्टी घडू शकतात. यासाठी शिक्षकांमध्ये एकी असणे उपयोगी ठरते. मुलांचे वय नाजूक अवस्थेतून जात असते. त्यांना समजून घेऊन समजावून, समुपदेशन करुन त्यांच्या पालकांशी बोलून यावर मार्ग काढावा. त्याचा ताण अजिबात घ्यायचा नाही. ‘आ रे’ला ‘का रे’ करू नये. डोकं शांत ठेवून त्यावर युक्तीपूर्वक मार्ग काढावा. हल्ली शिक्षकांनाही संगणकावर रोज काम करावे लागते. त्या विशिष्ट स्थितीमध्ये बराच काळ बसल्याने मान आखडणे, पाठ दुखणे आणि मगनट जखडणे होऊ शकते. हे टाळण्यासाठी दर ३० मिनिटांनी जागच्या जागी घड्याळाच्या काट्यानुसार मान फिरवावी तशीच विरुद्ध बाजूने मान फिरवावी. जागी उभे राहून कंबरेतून पुढे वाकावे व मागे झुकावे बाजूने ट्वीस्ट करावे. मनगटही गोल फिरवावे. बहुतांशी वेळेस संगणक कक्षात एसी असतो. खूप वेळ एसीच्या सान्निध्यात राहिल्याने त्वचा कोरडी पडते, खाज येते आणि शरीर कडक होते, हे टाळण्यासाठी नित्य अभ्यंग आवर्जून करावे. त्रास झाल्यावर उपचार करण्यापेक्षा खबरदारी केव्हाही महत्त्वाची शेवटी म्हटलेच आहे, prevention is better than cure
- वैद्य कीर्ती देव