जनसंघाचे संस्थापक, शिक्षणतज्ज्ञ, राष्ट्रभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहवास आणि मार्गदर्शन लाभले. सावरकर हे राष्ट्रवादाचे सिद्धांतकार होते, तर मुखर्जी हे राष्ट्रवाद व्यवहारात उतरवणारे नेते होते. त्यांनी जनसंघाच्या माध्यमातून सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारांना राजकीय स्वरुप प्राप्त करुन दिले. त्यानिमित्ताने सावरकर आणि मुखर्जी यांच्यातील राष्ट्रकार्याच्या दृष्टीने विचारांची एकजूट अधोरेखित करणारा हा लेख...
एखाद्या सामान्य वाटणार्या दिवशी अचानक एका दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या यायला लागतात. हल्ला आपल्यापासून दूर काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेला असतो. दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या घोळक्यातून हिंदू पर्यटकांना वेचून वेचून मारलेले असते. या हल्ल्याच्या आणि मृत पर्यटकांच्या येणार्या प्रत्येक नवीन माहितीसोबत आपल्या मनात तीव्र संताप, आश्चर्य, वेदना, दुःख अशा संमिश्र भावना दाटून येतात. या पर्यटकांच्या जागी आपणसुद्धा असू शकलो असतो, ही जाणीव मन अस्वस्थ करत राहते. आपला निर्घृण अपराध जगासमोर छातीठोकपणे मान्य करणारे दहशतवादी आणि त्यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे तथाकथित पुरोगामी, यांच्यामध्ये आपल्याला जास्त तिरस्कार कोणाचा वाटतोय, याचे अखंड विचारमंथन आपल्या मनात सुरू असते. अशा वेळी सतर्कतेचा इशारा देणारे, वाचलेले सावरकर आठवत राहतात.
दिवस उलटतात, पण मनातली आग विझत नाही. आपण काय केल्यावर आपली इतिकर्तव्यता सिद्धीस जाईल, याचा विचार करताना तात्याराव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आज असते, तर त्यांनी काय केले असते, असा पुसटसा विचार नकळत आपल्या मनात येऊन जातो आणि सोबतच आठवतात, त्यांचे सहकारी श्यामाप्रसाद मुखर्जी. प्रत्येक भारतीयाला काश्मीरमध्ये मुक्तपणे विहार करता यावा, म्हणून त्यांनी केलेला सत्याग्रह, भोगलेला कारावास आणि काश्मीरमध्ये मुक्त प्रवेश करून घेतलेली मृत्यूची गळाभेट...
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीमध्ये जे कोणी तेजस्वी, प्रखर राष्ट्रभक्त आणि वैचारिकदृष्ट्या परिपक्व नेते होते, त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे योगदान विशेष महत्त्वाचे आहे. यांचा परस्पर संबंध हा केवळ सहकार्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांच्या विचारधारेत एक प्रकारची सुसंगती आणि पूरकता होती. ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहकारी’ म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा उल्लेख करताना, केवळ व्यक्तिगत स्नेह नव्हे, तर राष्ट्रकार्याच्या दृष्टीने त्यांचा सहवास व विचारांची एकजूट किती महत्त्वाची होती, हे अधोरेखित करणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारी विचारसरणीचे, विज्ञाननिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी हिंदुत्व, स्वातंत्र्य, सैनिकीकरण, राष्ट्रवाद यांचे महत्त्व आपल्या कार्यातून व विचारांतून मांडले. त्याच वेळेस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे शिक्षणतज्ज्ञ, राष्ट्रभक्त आणि पुढे जनसंघाचे संस्थापक म्हणून उभे राहिले. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले असले, तरी विचार मात्र भारतीय परंपरेत खोलवर रुजलेले होते. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वैचारिक आणि राजकीय जिव्हाळा होता.
भारतीयांना शिक्षण व नेतृत्व यात डावलले जाण्याचा काळ असताना, श्यामाप्रसाद मुखर्जी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी कोलकाता विद्यापीठाचे सिनेट सदस्य होतात आणि पुढे वयाच्या 33व्या वर्षी त्यांची कुलगुरूपदी निवड होते, ही बाब त्यांच्या बुद्धीची आणि शैक्षणिक क्षेत्रातील नैपुण्याची चुणूक दाखवते. त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनात पारदर्शकता, शिस्त आणि गुणवत्ता यांना प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागवणे, हे त्यांच्या धोरणाचे केंद्रबिंदू होते.
राजकारणात सक्रिय प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला ते हिंदू महासभेशी जोडले गेले. सावरकर व मुखर्जी यांचे सहकार्य हे मुख्यतः हिंदू महासभेच्या कार्यकाळात दिसते. 1939 साली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू महासभेमध्ये सहभागी झाले. सावरकर त्यावेळी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. राष्ट्राच्या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाच्या हितरक्षणासाठी दोघांनी एकत्र काम केले. मुखर्जी यांनी बंगालमध्ये मुस्लीम लीगच्या वाढत्या प्रभावाविरोधात ठाम भूमिका घेतली. त्याचवेळी सावरकरांनी हिंदू समाजात सशक्तीकरण आणि राजकीय संघटनाची गरज अधोरेखित केली होती. हेच विचार मुखर्जी यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवले. मुखर्जी हे सावरकरांच्या राजकीय हिंदुत्वाच्या संकल्पनेचे मूर्त रूप होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
1943 साली बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला, ज्यात लाखो लोक मृत्युमुखी पडले. या संकटाच्या वेळी ब्रिटिशांची निष्क्रियता आणि मुस्लीम लीग सरकारची असंवेदनशीलता दिसून आली. या काळात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनतेसाठी मदतीचे कार्य उभारले. या काळात सावरकर व मुखर्जी यांच्यात सतत पत्रव्यवहार होत असे. सावरकरांनी मुखर्जींना हिंदू महासभेच्या कामासाठी अधिक प्रबळ भूमिका घ्यावी, असे सूचवले.
बंगालमधील दुष्काळाप्रमाणे काही गंभीर प्रश्नांवर सावरकर आणि मुखर्जी यांनी एकत्र येऊन कार्य केले व संकटावर मात केली. सावरकर आणि मुखर्जी दोघेही पक्के राष्ट्रभक्त होते. दोघांनी भारतीय सांस्कृतिक परंपरेचा अभिमान बाळगून भारताला एक शक्तिशाली आणि ‘आत्मनिर्भर’ राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला होता. दोघांचेही मत होते की, धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘हिंदुत्व नाकारणे’ नव्हे. भारताचे राष्ट्रीयत्व ही केवळ एक राजकीय संकल्पना नसून, ती एक सांस्कृतिक संकल्पना आहे. सावरकरांनी हिंदुत्व हे केवळ धार्मिक नव्हे, तर एक सांस्कृतिक व राजकीय ओळख म्हणून मांडले. मुखर्जी यांनीही हिंदू समाजाच्या आत्मविश्वासाचे पुनरुत्थान करण्यासाठी कार्य केले. सावरकरांनी स्वदेशी व विज्ञाननिष्ठ समाजाची संकल्पना मांडली होती. मुखर्जी हे शिक्षणतज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी औद्योगिक विकास, विज्ञान, शिक्षण आणि आधुनिक विचारसरणीवर भर दिला.
स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची उद्योग व पुरवठामंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात अनेक औद्योगिक धोरणांमध्ये मूलभूत बदल घडून आले. त्यांनी ‘मेड इन इंडिया’ या संकल्पनेला चालना दिली. तथापि, पुढे जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाच्या विरोधात त्यांनी आपला ठाम विरोध नोंदवला आणि नेहरूंच्या धोरणांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेत सावरकर आणि मुखर्जी यांनी भारताच्या एकात्मतेसाठी आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांच्या जपणुकीसाठी जागरूक भूमिका घेतली. विशेषतः, काश्मीर प्रश्नावर दोघांचे विचार ठाम होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यांपैकी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे, काश्मीर प्रश्न. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. जम्मू-काश्मीरच्या महाराजांनी सुरुवातीला स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, पाकिस्तानने आक्रमण केल्यामुळे महाराज हरिसिंह यांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. भारताने काश्मीरचा बचाव केला आणि जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला. परंतु, विशेष परिस्थितीमुळे जम्मू-काश्मीरला भारतीय संविधानात ‘कलम 370’अंतर्गत विशेष दर्जा देण्यात आला. यामुळे काश्मीरला स्वतंत्र संविधान, स्वतंत्र ध्वज आणि विशेष अधिकार मिळाले. हाच विशेष दर्जा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या असंतोषाचे कारण ठरला. काश्मीरला विशेष दर्जा देणे, हे भारताच्या अखंडतेविरुद्ध आहे, असे त्यांचे मत होते. त्यांनी एका देशात दोन विधान, दोन प्रधान, दोन निशाण (एका देशात दोन संविधान, दोन पंतप्रधान, दोन झेंडे) हे स्वीकार्ह नसल्याचे ठामपणे सांगितले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरच्या विशेष दर्जाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. त्यांनी भारतात प्रवेश करण्यासाठी परवानगी घेणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आणि याविरोधात 1953 साली आंदोलन सुरू केले. त्यांनी नारा दिला, ‘काश्मीर आमचा आहे, तिथे कोणतेही वेगळे नियम चालणार नाहीत!’
मुखर्जी यांनी ठरवले की, ते काश्मीरमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करतील. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगातच दि. 23 जून 1953 रोजी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर देशभर तीव्र संताप उसळला आणि काश्मीरच्या विशेष दर्जावर पुनर्विचार सुरू झाला. भारताचे एकात्म राष्ट्रत्व अबाधित राहावे, या भूमिकेसाठी मुखर्जी यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. सावरकरांनी त्यांच्या कार्याचे समर्थन करताना सांगितले की, ही केवळ एका नेत्याची नव्हे, तर एका राष्ट्रनिष्ठ विचारसरणीची हानी आहे.
सावरकर हे राष्ट्रवादाचे सिद्धांतकार होते, तर मुखर्जी हे राष्ट्रवाद व्यवहारात उतरवणारे नेते होते. त्यामुळे त्यांचे विचार आणि कार्य एकमेकास पूरक होते. सावरकरांचे विचार पुढे संघपरिवाराने आणि अनेक राष्ट्रवादी संस्थांनी चालवले. त्याचप्रमाणे, मुखर्जी यांनी स्थापलेला भारतीय जनसंघ आजच्या भारतीय जनता पक्षाचा पाया आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी या संबंधांमध्ये केवळ सहकार्य नव्हे, तर राष्ट्रहितासाठीची एक वैचारिक साखळी दिसते. डॉ. मुखर्जी हे सावरकरांच्या विचारांचे समर्थक, आस्थेवाईक आणि पुढे नेणारे नेतृत्व होते. त्यांनी सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला राजकीय रूप दिले. सावरकरांचे लिखाण आणि मुखर्जींचे कार्य हे दोन्ही स्वतंत्र भारताच्या राजकीय आणि वैचारिक अधिष्ठानासाठी अत्यंत मोलाचे ठरले. आजही या दोघांचे जीवनकार्य, प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयासाठी प्रेरणास्रोत आहे.
- अश्विनी कुलकर्णी