धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? काय म्हणाले अजितदादा?
17-Feb-2025
Total Views | 41
मुंबई : बीड हत्या प्रकरणानंतर सर्वत्र मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रविवार, १६ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "बीडमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून दोषींना योग्य शासन केले जाईल. माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर मला ते पटले नाही. मी अतिशय स्वच्छपणे काम केले होते. पण त्यावेळी मला बदनाम करण्यात आले. जनमानसात माझी प्रतिमा मलिन करण्यात आली. त्यामुळे मी राजीनामा दिला होता. लाल बहादूर शास्त्री रेल्वेचा अपघात झाल्याने त्यांनी राजीनामा दिला. पण त्यानंतर कितीतरी अपघात झालेत. पण सगळ्यांनी राजीनामे दिलेत का? त्या त्या वेळी ती परिस्थिती असते. आज बीड प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाई, असे आम्ही सारखे सांगत आहोत," असे ते म्हणाले.
यानंतर धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा का दिला नाही? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, "आपण धनंजय मुंडेंना प्रश्न विचारा. ते सुद्धा सगळे बघत आहेत. यात माझा दुरान्वयेही संबंध नाही असे त्यांचे म्हणणे आहे," असेही ते म्हणाले.