झारखंडचे 3 शत्रू जनतेने ओळखावे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जेएमएम, आरजेडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल
16-Sep-2024
Total Views | 57
रांची, दि. १५ : (Jharkhand) “जेएमएम, आरजेडी आणि काँग्रेस हे झारखंडचे तीन मोठे शत्रू आहेत. हे शत्रू झारखंडवासीयांनी लवकर ओळखल्यास झारखंडचा भाग्योदय निश्चित आहे. झारखंडनिर्माणाचे उट्टे आजही आरजेडी झारखंडकडून फेडत आहे आणि काँग्रेस झारखंडचा शत्रू आहेच,” असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाटानगर, झारखंड येथे 660 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी कनेक्टिव्हीटी वाढवणार्या सहा वंदे भारत गाड्यांनादेखील पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जेएमएमने दलित, मागास आणि आदिवासी यांना पुढे येऊ दिले नाही. स्वार्थ आणि सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जातील जेएमएम आदिवासींचे जंगल, जमीन हडप करणार्यांसोेबत आहे.”
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात येथील वाढत्या घुसखोरविषयी चिंता व्यक्त केली. “घुसखोरी ही सध्या झारखंडवासीयांच्या चिंतेचा विषय आहे. यामुळे पालकांची अक्षरशः झोप उडाली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीच स्वतंत्र्य पॅनलच्या माध्यमातून घुसखोरीची चौकशी करण्याचे आदेश झारखंड उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, तरीही येथील जेएमएम सरकार घुसखोरी मान्य करत नाही,” असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संथाल परगणा आणि कोलहानमध्ये बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या धोक्याकडेही जनतेचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, “घुसखोरीमुळे या क्षेत्राची ओळख वेगाने बदलली जात आहे. संथाल परगण्यात आदिवासींची लोकसंख्या वेगाने कमी होत असून त्यांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. घुसखोर पंचायत व्यवस्थेवर कब्जा करत आहेत. महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. येथील शहरी भाग असो, वा ग्रामीण भाग येथील घुसखोरीमुळे प्रत्येक झारखंडवासीयामध्ये असुरक्षिततेची भावना आहे.”
“जेएमएमचे लोक त्यांच्या बाजूने उभे आहेत. हे घुसखोर, कट्टरपंथी जेएमएम आपल्या कब्जात घेऊ लागले आहेत. घुसखोर आता जेएमएममध्येदेखील घुसले आहे. काँग्रेसचे भूत जेएमएममध्ये शिरल्यामुळे सुरू झालेल्या तुष्टीकरणाचा हा अनिष्ट परिणाम आहे,” असा हल्ला पंतप्रधानांनी चढवला. “तुमचे मत जेएमएम आणि काँग्रेसला जाऊ देऊ नका. यासाठी एकजूट करा आणि भाजपला मजबूत करा,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले.
झारखंडमध्ये भारताचे सर्वात समृद्ध राज्य बनण्याची क्षमता
झारखंडमध्ये भारताचे सर्वात समृद्ध राज्य बनण्याची क्षमता आहे,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, “आमचे सरकार विकसित झारखंड आणि विकसित भारताप्रति वचनबद्ध आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने देशाचा दृष्टिकोन आणि प्राधान्य बदलले. पूर्व भारतात रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्तारामुळे संपूर्ण प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पूर्वी आधुनिक विकास केवळ काही राज्यांपुरता मर्यादित होता आणि झारखंडसारखी शहरे आणि राज्ये मागे राहिली.” त्या काळाची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने देशाच्या विचारसरणीत आणि प्राधान्यक्रमात परिवर्तन घडवून आणल्याचे अधोरेखित करतानाच त्यांनी “गरीब, आदिवासी, दलित, वंचित, महिला, तरुण आणि शेतकरी हे देशाचे प्राधान्य आहेत,” असे नमूद केले.
“सहा नवीन वंदे भारत गाड्यांमुळे सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार आहे. वाराणसी-देवघर वंदे भारत गाडी सुरू झाल्यामुळे भारतातून आणि जगभरातून काशीला भेट देणार्या यात्रेकरूंना आता देवघरमधील बाबा बैद्यनाथाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. यामुळे या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळेल तसेच टाटानगरच्या औद्योगिक विकासालादेखील प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील,” असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. “झारखंडचा सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी केंद्र सरकारने तेथील गुंतवणुकीत वाढ केली असून विकासकामांचा वेगही वाढवला आहे,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार, तसेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंग चौहान यावेळी उपस्थित होते.