नाशिक :आठवडाभरापासून सतत कोसळणार्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या कोसळधारांनी संपूर्ण जिल्हा झोडपून काढला असून विविध धरणांमधील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जात आहे. दारणा, गंगापूर धरणांच्या पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाशिकला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणातील जलसाठा 80 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
रविवार, दि. 4 ऑगस्ट रोजी गंगापूर धरणातून सहा हजार क्युसेक विसर्ग सुरू होता, जो रात्री 8.30 वाजेपासून आठ हजार क्युसेक इतका करण्यात आला. सातत्याने विसर्गात वाढ होत गेल्याने गोदावरीला पहिला पूर आला. रामकुंडावरील अनेक छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली. गोदाघाट परिसरातील दुकाने प्रशासनाकडून हटविण्यात आली. त्याचप्रमाणे, मुसळधार पाऊस कायम राहिल्यास गंगापूर धरणातून विसर्ग आणखी वाढवला जाणार असून जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाच्या वाढलेल्या मुक्कामामुळे दारणातून 22 हजार, 966, भावलीतून 1 हजार, 821, भाममधून 5 हजार, 920, पुनद 5 हजार, 440, कडवा 8 हजार, 298, तर पालखेड धरणांमधून 2 हजार, 345 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच, जलसाठ्यात वाढ झाल्यास आणखी विसर्ग करण्यात येणार आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्यातूनही गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 40 हजार क्युसेकच्या आसपास विसर्ग करण्यात आला. सातपूर परिसरात काही झाडांची पडझड झाली. त्याचप्रमाणे, दि. 1 जून रोजीपासून जायकवाडीच्या दिशेने आतापर्यंत 4.7 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर वाहतुककोंडी
नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने चांगलीच कृपादृष्टी दाखवल्याने काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. पावसाचा काहीसा फटका मुंबई महार्गावरील वाहनचालकांना बसला. नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विल्होळी येथे विस्कळीत झाली. रविवार, दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता याठिकाणी वाहतुककोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
महामार्गावर सुमारे तीन ते चार किमी रांगा लागल्याचे दिसून आले. वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक झाल्यानंतर या महामार्गाची दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे दहा ते 12 किमी रस्त्याची वाहतूक एकेरी करण्यात आल्याने नाशिक-मुंबई महामार्गावर वाहतुककोंडी नित्याचीच झाली आहे.
जनजीवन विस्कळीत
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. छोट्या-मोठ्या नद्या, नाले, ओहोळ आणि चार्या प्रवाहित झाल्याने ठिकठिकाणच्या बंधार्यांमधील जलसाठा वाढला आहे. शेतकरीवर्गासाठी ही आनंदाची बाब असली, तरी जास्त पाऊस झाल्यास खरीपाची पिके सडण्याची शक्यता आहे. तसेच, रोगराईदेखील वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आपत्कालीन कक्षाला आयुक्तांची अचानक भेट रविवारी दिवसभर शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नाशिक मनपाच्या मुख्यालयातील आपत्कालीन कक्ष, मुख्य कंट्रोल रूमला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी सायंकाळी 7 वाजता अचानक भेट दिली. आपत्कालीन विभागात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी यावेळी घेतली.
नाशिक मनपाच्या मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालयात आपत्कालीन कक्ष 24 तास सुरू असून कोणत्याही भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी मनपाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
चांदोरीचे खंडेराव मंदिर पाण्याखाली
निफाड तालुक्यातील चांदोरी येथे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने गावातील प्रसिद्ध खंडेराव मंदिरासह हेगडी प्रधान मंदिरे आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेली. गोदावरीच्या काठावर असलेल्या चांदोरी, सायखेडा आणि करंजवण या गावांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिन्नर तालुक्याची जीवनवाहिनी असलेली देवनदीदेखील प्रवाहित झाल्याने पूर्व भागातील शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रविवार, दि. 4 ऑगस्ट रोजी पहाटे सिन्नर-शिर्डी महार्गावरील खोपडी बुद्रुक येथील बंधारा भरल्याने पाणी देवपूरच्या दिशेने जात आहे.
गिरणा नदी धोक्याच्या पातळीकडे
चणकापूर धरण पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून 5 हजार, 60 इतका विसर्ग होत असल्याने गिरणा नदी दुथडी भरून वाहात असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पुनद धरणातूनही गिरणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होत असल्याने गिरणा नदी धोक्याच्या पातळीकडे जात आहे. समाधानकारक पाऊस बरसल्याने मालेगाव तालुका आणि जळगाव जिल्ह्यातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास मिटला आहे.
सुरगाण्यातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
सुरगाणा तालुक्यातील पश्चिमवाहिनी सर्वच नद्या दुथडी भरून वाहात असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. नार, पार, तान, मान, अंबिका या नद्यांना महापूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्याचप्रमाणे, वाझडी आणि वाकी नदीला पूर आल्याने आंबूपाडा गावच्या लोकांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागत आहे. तर सीमा भागावर असलेल्या पिंपळसोंड गावाचा तालुक्यासोबत संपर्क तुटला आहे.
नाशिक :372.6
दिंडोरी : 282.9
इगतपुरी :135.7
पेठ : 285.9
निफाड: 229.0
सिन्नर:249.6
येवला: 33.8
चांदवड 16.9
त्र्यंबकेश्वर:8.8
देवळा:355.6
त्र्यंबकेश्वरमधील घरे, रस्ते पाण्याखाली
रविवार सकाळपासून त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पाऊस कोसळल्याने त्र्यंबकेश्वर शहरातील दुकाने आणि घरांसह त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरले. त्र्यंबकेश्वर मंदिरात गोदावरी नदीच्या पाठीमागच्या बाजूने पूर आल्याने मंदिरात पाणी शिरले असून मंदिराच्या मागील बाजूस असलेले गायत्री मंदिरातही पाणी शिरले.
त्याचबरोबर, त्र्यंबकेश्वर शहरातील लक्ष्मी नारायण चौक, भगवती चौक, बोहरपट्टी, गोकुळदास लेन, गोकुळदास कॉर्नर या भागातील 25 ते 30 घरे आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.
संततधार सुरू असल्याने शहरातील गंगासागर तलाव तीन वर्षांनंतर प्रथमच भरून ओसंडून वाहात आहे. अहिल्यानगर, अंबोली आणि बेझे धरण भरल्याने अधिकचे पाणी गंगापूर धरणाकडे प्रवाहित झालेले आहेत. तसेच, परिसरातील नदी, नाले दुथडी भरून वाहात आहेत.
चांदवडमध्ये सर्वाधिक, तर मालेगावात सर्वात कमी
दि. 1 ऑगस्ट रोजी ते दि. 4 ऑगस्ट रोजीपर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद चांदवड तालुक्यात, तर सर्वात कमी पाऊस मालेगाव तालुक्यात झाला. चांदवडला 416.9, तर मालेगावमध्ये 122.8 मिमी पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात 135.7, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात 198.8 मिमी पावसाची नोंद झाली. तर कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या सिन्नर तालुक्यामध्ये 249.6 आणि नांदगाव तालुक्यामध्ये 160.8 मिमी पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक चांगला पाऊस पडल्याने सद्यस्थितीत शेतीचा आणि पिण्याचा प्रश्न सुटला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत येथे साधा संपर्क
आपत्कालीन कक्षाचे ठिकाण संपर्क क्रमांक
मुख्य आपत्तीव्यवस्थापन कक्ष, मनपा 0253-2571872
0253-2317505
पंचवटी 0253-2513490
सातपूर 0253-2350367
नाशिक(पू)0253-2504233
नाशिक(प)0253-2570493
नवीन नाशिक0253-2392010
नाशिकरोड 0253-2460234
पुराच्या पाण्यात युवक गेला वाहून
गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदाघाटावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. रामकुंड परिसरातून पुराच्या पाण्यात एक 29 वर्षीय युवक व तीन वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली. यातील मुलीला वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले.
यग्नेश पवार असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव असून तो ओझर येथील रहिवासी आहे. महावितरणमध्ये तो अभियंता या पदावर कार्यरत असून भुसावळ येथे त्याची नेमणूक होती. नीलकंठेश्वर मंदिर येथे कालसर्प योगपूजेनिमित्त तो आला असता, पूजेवेळी नदीत पाय घसरून पडल्याने तो वाहून गेला. युवकाचा शोध घेण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
गरज असेल, तरच घराबाहेर पडा
राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहावे. नदीकाठावरील नागरिकांनी पुराची पातळी लक्षात घेऊन आपली काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकार्यांशी संवाद साधून सर्र्वेतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गंगापूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सरकारी यंत्रणा रस्त्यावर उतरून काम करत आहेच, मात्र नागरिकांनीदेखील सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. तसेच गरज असेल, तरच घराबाहेर पडावे.