मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील पावरफुल्ल कपल म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन. या दोघांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित काम केलं होतं. दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अँग्री यंग मॅन' या माहितीपटामध्ये जावेद अख्तर आणि सलीम खान यांची मैत्री आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाल्याची कथा सांगण्यात आली आहे. तसेच, याच माहितीपटात अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेण्यात आल्या असून या मुलाखतींमध्ये काही खुलासेही करण्यात आले आहेत. यावेळी एका मुलाखतीत जया बच्चन म्हणाल्या की, 'मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'जंजीर' या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम करायचं नव्हतं.' जया यांनी त्यामागचं कारणसुद्धा सांगितलं आहे.
माहितीपटामध्ये जया बच्चन यांनी खुलासा केला की, “सुरुवातीला 'जंजीर' मध्ये काम करायचं नव्हतं. मला कधीच पुरुषकेंद्री सिनेमात काम करायचं नव्हतं. जंजीर हा पुरुषकेंद्री सिनेमा होता. प्रकाश मेहरा यांनी इतर अनेक अभिनेत्रींना सिनेमासाठी विचारलं पण त्यांनी नकार दिला.'पुढे त्या म्हणाल्या की, 'प्रकाश मेहरा मला म्हणाले, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. आम्हाला तुमची गरज आहे.' अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्यासोबत एकत्र वेळ घालवता येईल यासाठी; नंतर जया बच्चन 'जंजीर' चित्रपटात काम करण्यास तयार झाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे ज्या चित्रपटात काम करण्यासाठी जया यांनी नकार दिला होता त्याच्या प्रदर्शनाच्या एका महिन्यानंतरच अमिताभ आणि जया लग्नबंधनात अडकले होते.