पुणे : शरद पवार हे ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेने पाहत नाहीत. परंतू, मनोज जरांगेंना त्यांचा पडद्यामागून पाठिंबा आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत तुम्ही का गेले नव्हते? असा सवालही त्यांनी केला आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले की, "गेली ८-१० महिने महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठ्यांमध्ये अशांतता निर्माण झाली असताना शरद पवार एकही शब्द का बोलले नाहीत? किंवा मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत तुम्ही का गेले नव्हते? परंतू, यापुढे जर अशा प्रकारची सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात येत असेल तर तिला आम्ही हजर राहू आणि आमची भूमिका मांडू. पण पवार साहेब, तुम्ही ही बैठक लवकरात लवकर बोलवा. अन्यथा लोकसभेला तुम्ही मराठा आणि ओबीसींच्या संघर्षाचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या सत्तेची पोळी भाजली, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "शरदचंद्र पवार हे ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेने पाहत नाहीत. ते महाराष्ट्राचे जाणते नेते आहेत. पण जेव्हापासून महाराष्ट्रात ही परिस्थिती उद्भवली तेव्हापासून शरद पवार शांतपणे आणि निमूटपणे पडद्यामागून मनोज जरांगे पाटील नावाच्या माणसाला उद्युक्त करण्याचा प्रयत्न करत आहे," असा आरोपही त्यांनी केला आहे.