नाशिक : यंदाचा खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून वेळेत मान्सून दाखल झाल्याने समाधानकारक पेरण्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नाशिक शहर आणि आजूबाजूचा परिसर वगळता दुष्काळी तालुक्यांबरोबरच सगळीकडे पावसाळ्याच्या तोंडी दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकरीवर्गाला चांगला गेल्याचे बोलले जात आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात सुमारे 6 लाख, 28 हजार, 700 हेक्टर क्षेत्र खरीप हंगामात लागवडीखाली आले आहे. तर मागील वर्षी 6 लाख, 26 हजार, 190 हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली होती. यंदा खरिपाचे क्षेत्र 2 हजार, 510 हेक्टरने वाढले आहे.
...या पिकांची झाली लागवड
मका, सोयाबीन, भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, कुळीथ, टोमॅटो या प्रमुख पिकांबरोबरच इतरही पिके घेण्यात आली. यंदा मका या पीकाचे सर्वाधिक 2 लाख, 42 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. त्याखालोखाल सोयाबीनची लागवड झाली असून एक लाख हेक्टरवर उत्पादन घेण्यात आले आहे. त्याखालोखाल भात 94 हजार, ज्वारी 600, बाजरी 61 हजार, नागली 16 हजार, तर इतर पिकांची एक लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.
मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
इतर वर्षांची तुलना करता, यंदा लष्करी अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे. जिल्ह्यात सटाणा, मालेगाव, देवळा आणि कळवण या तालुक्यांमध्ये नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही अळी झाडाच्या पोग्यात अंडी घालून पिकाची पूर्ण पाने कुरतडते. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली जाऊन पूर्ण पीक खराब होऊन मोठे आर्थिक नुकसान होते. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृषी विभाग पुढे सरसावला असून योग्य मशागत, भौतिक, जैविक आणि रासायनिक पद्धतींची उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नव्याने खतांचा पुरवठा
नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात प्रामुख्याने मका, बाजरी, मूग, उडीद ही पिके लावण्यात आली आहेत. तर दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील बहुसंख्य शेतकरीवर्गाने मका, सोयाबीन, टोमॅटो ही प्रमुख, तर भुईमूग, मूग, उडीद, तीळ ही आंतरपिके लावली असून पेठ, सुरगाणा, घोटी, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे भात आणि नागलीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात खरीप हंगामात घेतल्या जाणार्या सर्वच पिकांची लागवड करण्यात आली असून त्यासाठी लागणारी खतं कृषी विभागाकडून उपलब्ध केली गेली. यावर्षी 2 लाख, 20 हजार टन खतांचा साठा मंजूर करण्यात आला होता. तर मागणी करण्यात आल्याप्रमाणे 71 हजार, 243 क्विंटल बियाणे कृषी विभागाकडून पुरवण्यात आले.