मुंबई : 1982 साली केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दलितांसाठी हा शब्द वापरू नये, असे निवेदन दिले होते, याचा कदाचित काँग्रेसला विसर पडलेला आहे. 2010 साली सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पुन्हा नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली. पण, काँग्रेसने ‘हरिजन’ हा शब्द का वापरला? याचे एकच कारण असू शकते आणि ते म्हणजे अहंकार. काँग्रेससारख्या सापाने वेळोवेळी दलितांना आपले खरे विषारी दात दाखवले असल्याची टीका ‘वंचित बहुजन आघाडी’चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
अॅड. आंबेडकर म्हणाले की, “गांधीजींनी अस्पृश्यांसाठी ‘हरिजन’ हा शब्द वापरण्यास सुरुवात केली, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यास कडाडून विरोध केला आणि म्हटले की, हा अपमानास्पद आणि फसवा शब्द आहे. जातिवाद आणि अस्पृश्यतेच्या वास्तविक समस्येवर गप्प बसवण्याचा हा प्रयत्न आहे.” कोणावर विश्वास ठेवावा? अॅड. आंबेडकर म्हणाले की, “दलितांनी ठरवले पाहिजे की, काँग्रेसवर विश्वास ठेवायचा, की स्वतंत्र नेतृत्व असलेला आंबेडकरवादी पक्षावर, जो कोणत्याही जानवेधार्यांच्या तालावर कधीही नाचला नाही आणि कधी नाचणार नाही.”