श्रीनगर : काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान पूर्ण मदत करत आहे. काश्मीरमध्ये भारताविरुद्ध अनेक दशकांपासून छद्म युद्ध पुकारणारा पाकिस्तान दहशतवाद्यांना केवळ औषधे आणि शस्त्रेच देत नाही, तर भारतीय सुरक्षा दलांपासून सुरक्षित राहून भारतीयांवर हल्ले करू शकतील यासाठी उच्च तंत्रज्ञानाची साधनेही पुरवत आहे.
अलीकडेच, रियासी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले असून, त्यांच्याकडून पाकिस्तानी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तान ज्या दहशतवाद्यांना आतापर्यंत छुप्या पद्धतीने मदत करत होता, तेच आता उघड्यावर आल्याचे जप्त केलेल्या वस्तूंवरून स्पष्ट झाले आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, काश्मीर खोऱ्यातील भागांच्या तुलनेत अलीकडच्या काळात जम्मू भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तानने आता येथे दहशतवादी सक्रिय केले आहेत. या मालिकेत कठुआ जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळील हिरानगर भागात रियासीमध्ये बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. मारला गेलेला एक दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर रिहान होता, तर दुसरा त्याचा पीएसओ होता.
दोन्ही दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंवरून दोन्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडून मदत मिळत असल्याचे दिसून येते. ठार झालेल्या दहशतवादी रिहानकडून नाईट स्कोप आणि फ्रीक्वेंसी सॅटेलाइट कम्युनिकेशन उपकरण असलेली एम-फोर रायफल सापडली आहे. याशिवाय मायक्रो कंपनीचे सॅटेलाइट कम्युनिकेशन यंत्रही ते वापरत होते. मायक्रो कंपनीची उपकरणे पाकिस्तानचे लष्कर, नौदल आणि हवाई दल वापरतात. जे दहशतवाद्यांच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुष्टी करते.
जम्मू-काश्मीरमधील रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यात एका आठवड्यात दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये सीआरपीएफ जवानासह ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील रावळकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या नेत्यांची बैठक झाली. यात जैशचा कमांडर रझाक आणि हिजबुलचा डेप्युटी कमांडर खालिद सहभागी झाला होता. सभेत दिलेल्या भाषणादरम्यान भारताचे अधिक नुकसान करण्याचे आवाहन त्याने केले.