मुंबई, दि.३१: प्रतिनिधी पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ते वाहतूकयोग्य असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा योग्य ठिकाणी पुनर्पृष्ठीकरण करावे. पुनर्पृष्ठीकरण करताना सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी बाळगावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यांच्या डागडुजीची कामे दिनांक ७ जूनपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी शुक्रवार, दि. ३१ मे रोजी पूर्व द्रुतगती महामार्गावरील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्ते दुरूस्ती कामांची पाहणी केली. चेंबूर पूर्व येथील के. बी. गायकवाड नगर, कुर्ला येथील राहुल नगर, घाटकोपर येथील छेडा नगर, घाटकोपर येथील पंत नगर जंक्शन, जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्ता (जेव्हीएलआर) जंक्शन आणि घाटकोपर पूर्वस्थित नालंदानगर या ठिकाणांना भेट दिली. दुरूस्ती कामांची स्थिती पाहून त्यांनी संबंधितांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले.
पाहणी दौऱयादरम्यान बांगर म्हणाले की, पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुख्य रस्ते आणि सेवा रस्ते वाहतूकयोग्य असावेत, यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यात खड्डे बुजविण्याबरोबरच सुधारणा योग्य भागांच्या (बॅड पॅचेस) पुनर्पृष्ठीकरणाचा समावेश आहे. जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्ता (जेव्हीएलआर) जंक्शन येथे प्रायोगिक तत्त्वावर 'जिओ पॉलिमर' आणि घाटकोपर येथील गोदरेज कंपनीसमोर 'मायक्रो सरफेसिंग' या पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे. रस्ते अभियंत्यांनी या दोन्ही पद्धतीचे फायदे स्पष्ट केले आहेत. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे आढळता कामा नये. त्यामुळे, आढळेल तो खड्डा तात्काळ बुजवावा, तसेच रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडा तात्काळ उचलून घ्यावा.
गुणवत्तेशी तडजोड खपवून घेणार नाही
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सध्या सुरू असलेली रस्त्यांच्या डागडुजींची कामे दिनांक ७ जून २०२४ पूर्वी पूर्ण करावीत आणि हे रस्ते पूर्णपणे वाहतूकयोग्य करावेत. अन्यथा कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल. रस्ते व वाहतूक विभागातील अभियंत्यांवर योग्य पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देखील अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.