अभिनेते मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंग पाठोपाठ आता दिग्दर्शिक एकता कपूर यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई : समस्त स्त्री वर्गातील लोकप्रिय दिग्दर्शिका म्हणजे एकता कपूर. ९० च्या काळात हिंदी मालिकाविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या एकता कपूर (Ekta Kapoor) यांनी एकापेक्षा एक सरस मालिका प्रेक्षकांना देऊ केल्या. मात्र, अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी आता एकता कपूर यांच्यावर निशाणा साधला असून, महाभारताचा एकता कपूर (Ekta Kapoor) यांनी सत्यानाश केला असे विधान खन्ना यांनी केले आहे.
मुकेश खन्ना यांनी 'डिजिटल कमेंट्री'ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये 'एकता कपूरने महाभारतचा सत्यानाश केला आहे,' असे मुकेश खन्ना म्हणाले. "मी बेधडकपणे बोलतो जे इतर कुणी कधीच बोलत नाही. इंडस्ट्रीत धर्माच्या विरोधात कामं केली जाताता. मी अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाच्या विरोधातही बोललो होतो. आता मी जसं एकता कपूरच्या विरोधात बोललो तर तिने उद्या चित्रपट करायचे ठरवले तर त्यात मी नसणार ." पुढे ते म्हणाले की, "मी या सगळ्यापासून लांबच आहे. कुणापुढे हात पसरायला मला आवडत नाही. आणि एकता मला काय काम देणार? तू तर महाभारतचा सत्यानाश केला आहेस. आता हे बोलायची हिंमत अन्य कोणत्या कलाकारामध्ये नाही", असे म्हणत खन्ना यांनी एकता यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
हे वाचलंत का? - “‘शक्तिमान’ चित्रपट कोणत्याही स्टारमुळे चालणार नाही”, रणवीरला मुकेश खन्ना यांनी सुनावले खडे बोल
एकता कपूर यांनी आत्तापर्यंत कौटुंबिक अनेक मालिका भेटीला आणल्या. बऱ्याचदा त्यात विविध प्रयोग देखील केले. अशात त्यांची महाभारत ही मालिका आणली होती. यावरुनच खन्ना यांनी त्यांना खडे बोल सुनावले. तसेच, काही दिवसांपुर्वी ‘शक्तिमान’ चित्रपटाबद्दल देखील मुकेश खन्ना यांनी वक्तव्य करत रणवीर सिंगने ही भूमिका साकारली नाहीच पाहिजे असे ठामपण त्यांनी म्हटले होते.