मुंबई : प्रभू श्रीराम यांची महती सांगणारे अनेक कार्यक्रम आजवर आले, पण दुरदर्शन वाहिनीवरील रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेची लोकप्रियता कुणी मागे पाडू शकले नाही. ८०-९० च्या दशकातील दुरदर्शनवरील गाजलेली रामायण मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेची लोकप्रियता लक्षात घेऊन रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी पुन्हा रामायण मालिका बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
'ईटाइम्स'शी बोलताना प्रेम सागर यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. लवकरच या शोची घोषणा करणार असल्याचंही त्यांनी सांगितले. रामाच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्याच्या शोधात असल्याचंही प्रेम सागर म्हणाले. "आमची संपूर्ण टीम रामाच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्याच्या शोधात आहे. रामाच्या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती भेटल्यानंतर या मालिकेची घोषणा आम्ही करू. मी एका नव्या व्यक्तिमत्वाच्या शोधात आहे. यापूर्वी कधीच श्रीरामाची भूमिका न साकारलेला कलाकार मला हवा आहे. माझ्यात मनात प्रभू श्रीरामाची जशी प्रतिकृती आहे, तसंच कोणी तरी मला या भूमिकेसाठी हवं आहे".
पुढे ते म्हणाले की, "या मालिकेचं दिग्दर्शन मी करणार नाही. जुन्या रामायण मालिकेतील कोणीही या मालिकेत नसेल. पण, माझ्यासाठी हे एक मोठं आव्हान आहे. कारण, प्रेक्षक याची तुलना करणार आहेत. पण, याची मला चिंता नाही. मला वाटतं की हे माझं भाग्य आहे." दरम्यान, रामानंद सागर यांच्या रामायणाप्रमाणेच प्रेम सागर यांची रामायण मालिकाही दूरदर्शनवरुनच प्रसारित केली जाणार आहे.