राज्याच्या सर्वांगिण विकासाचा रोडमॅप तयार करणार!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

    26-Dec-2024
Total Views | 47
 
Shinde
 
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विकासात काहीच कमी पडणार नसून आम्ही तुमच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली.
 
त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पहिल्यांदाच मी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातील जनतेने महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कामाची पोचपावती देत दैदीप्यमान विजय दिला. आम्ही पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या मनातील महायुतीचे सरकार स्थापन केले. अडीच वर्षांच्या कमी कालावधीत आम्ही खूप मोठे काम केले आणि आम्हाला त्याची पोचपावती मिळाली."
 
हे वाचलंत का? -  एसटी स्थानकांचा कायापालट करणार!
 
"महाराष्ट्राच्या विकासात काहीच कमी पडणार नसून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे मोदी साहेबांनी मला सांगितले. नवीन इनिंग सुरु झाली आहे. यात मला काय मिळाले यापेक्षा राज्याला काय देणार यासाठी आम्ही काम करत राहणार आहोत. यासाठी आवश्यक असलेले केंद्राचे पाठबळ देण्याचा विश्वास आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने दिला आहे. आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात या राज्याला पुढे नेणार आहोत. राज्याच्या सर्वांगिण विकासाचा एक रोडमॅप तयार करू. हे राज्य नंबर एकवर राहण्यासाठी प्रयत्न करू," असे त्यांनी सांगितले.
 
वन नेशन, वन इलेक्शन ही देशाची गरज!
 
"वन नेशन, वन इलेक्शन ही देशाची गरज आहे. आपण कायम इलेक्शन मोडमध्येच राहतो. त्यामुळे आचारसंहिता असताना विकास थांबतो, ही वस्तुस्थिती आहे. यात मोठ्या प्रमाणात जनतेचा पैसा खर्च होतो. त्यामुळे देशाच्या प्रगती आणि हितासाठी मोदीजींनी हा विचार मांडला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात देशाचा विकास होईल," असेही ते म्हणाले.
 
"काल एनडीएच्या बैठकीत अजित पवारांचे पुर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते आले नाहीत. त्यामुळे याला राजकीय वळण देण्याची गरज नाही. एनडीए मजबूत आहे. एनडीए ही स्वार्थ भावनेने एकत्रित आलेली इंडीया आघाडी नाही तर एका विचाराने एकत्रित आलेला पक्ष आहे. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वात एनडीए एकत्रपणे काम करेल," असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
 
कल्याणची घटना दुर्दैवी!
 
"कल्याणची घटना ही अतिशय दुर्दैवी, दु:खद आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी कालच पीडित कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. ही आमच्या परिवारातील घटना असल्याचे समजून आम्ही ती घटना गांभीर्याने घेतली आहे. यातील आरोपीवर कठोर शासन झाले पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सरकार गांभीर्याने पाहत आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे. परंतू, त्याचे राजकारण करणे हे त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी अशा घटनांकडे गांभीर्याने पाहायला हवे." तसेच अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. यावर बोलताना शिंदे म्हणाले की, "याबाबतीत पोलिस कसून चौकशी करत आहेत. या घटनेकडे आम्ही गांभीर्याने पाहतो आहोत. अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे."
 
कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे!
 
"बीडची घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने निर्घृण हत्या झाली ती कधीही माफ न करण्याजोगी आहे. या घटनेतील गुन्हेगार कितीही मोठा असला, कुणाच्याही जवळचा असला आणि त्याचे कुठेही लागेबांधे असले तरी कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे आहेत. त्यामुळे महायुतीचे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही," असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121