नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. मंगळवार, १७ डिसेंबर रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी अभिनंदन प्रस्तावाला विरोध करत असताना राज्यपालांचा अवमान केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या तासात भास्कर जाधव यांनी राज्य सरकारचा शपथविधी, मुख्यमंत्रीपद असे अनेक मुद्दे उपस्थित करत राज्यपालांच्या आचरणावर ठपका ठेवला. ते म्हणाले की, "अभिभाषणादरम्यान, राज्यपाल महोदयांनी प्रत्येकवेळी हे माझे सरकार असा उल्लेख केला. पण हे तुमचे सरकार कसे होऊ शकते याचा राज्यपाल महोदयांनी विचार करावा. नवीन सरकार बनवायचे असल्यास राज्यपालांनी बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावे लागते. परंतू, त्यांनी निमंत्रित केले नाही. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. पण आपण घटनेचे महत्व कमी करत आहोत. हे राज्यपाल पद घटनात्मक आहे की, नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. तुम्हाला राज्यपालांनी कधी बोलवले हे त्यांनी सांगायला हवे."
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ४ डिसेंबर रोजी निवड झाली. त्यानंतर तीन पक्षाचे नेते राज्यपालांकडे शपथविधीची मागणी करण्यासाठी गेलेत. पण प्रत्यक्षपणे आझाद मैदानावरील मंडपाचे काम आधीच सुरु झाले. ते कुणासाठी सुरु झाले? मुख्यमंत्री कोण होणार हे राज्यपालांनी ठरवले की, आणखी कुणी ठरवले? हे घटनात्मक पद असल्यास या पदाचा अधिकार काय आहे? शपथविधीची सगळी तयारी होऊनही राज्यपालांकडून कुठलीही अधिसूचना जारी करण्यात आली नाही. राज्यपाल कुठल्यातरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे. पण त्या खुर्चीवर बसले असताना त्या पदाची गरिमा आणि मानसन्मान राहिला पाहिजे याचे भान राज्यपाल महोदयांना असायला हवे," असे ते म्हणाले.
भास्कर जाधव यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच गदारोळ उडाला. यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांचे हे वाक्य रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणी केली. त्यानंतर अध्यक्ष महोदयांनी हे वाक्य काढून टाकणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, यावरून भास्कर जाधव प्रचंड संतापले आणि हे वाक्य काढून टाकण्यास नकार दिला. त्यानंतर अध्यक्ष महोदयांनी हे वाक्य तपासून घेऊन नंतर काढून टाकणार असल्याचे सांगितले.
मात्र, कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "विरोधी पक्ष हे वैफल्यग्रस्त झाले असून विधानसभा अध्यक्षांना आव्हान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. याआधी राज्यपाल महोदया संदर्भातील वाक्य कामकाजातून काढून टाकण्यासंदर्भात दिलेले रुलिंग बरोबर आहे. त्यात तपासणीची काहीच गरज नाही. त्यामुळे आधी दिलेला निर्णय कायम ठेवावा," असे त्यांनी सांगितले. तसेच राज्यपालांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल भास्कर जाधव यांनी माफी मागायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.
त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर न बोलता सत्ता कशी स्थापन झाली, हे सगळे भास्कर जाधवांचे बोलणे रेकॉर्डमधून काढून टाकावे, अशी हरकत आमदार आशिष जैस्वाल यांनी घेतली. तसेच सत्ता स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही, असेही ते म्हणाले. त्यानंतर अध्यक्षांनी भास्कर जाधवांचे वक्तव्य भाषणातून काढून टाकण्याची सूचना केली. यानंतरही भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा शपथविधीचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे सभागृहात परत गदारोळ झाला.