मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Muhammad Yunus Human Rights Day) मानवाधिकार दिनानिमित्त जारी केलेल्या एका परिपत्रकातून बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनुस यांनी एक अजब दावा केला आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकार प्रत्येक नागरिकाचे मानवी हक्क जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी 'मानवाधिकार दिन' बांगलादेशात साजरा केल्यानिमित्त हे परिपत्रक काढण्यात आले आहे. मात्र बांगलादेशात हिंदूंवरील सुरु असलेले अत्याचार पाहता युनुस सरकारची भूमिका ही डबलढोलकीच असल्याचे स्पष्ट दिसून येते.
आपल्या परिपत्रकात मुहम्मद युनुस पुढे म्हणाले, "भेदभाव न करता नवा बांगलादेश निर्माण करण्याच्या पार्श्वभूमीवर मानवाधिकार दिन साजरा करण्याचे महत्त्व आज नवीन पातळीवर पोहोचले आहे. विद्यार्थी आणि कामगारांच्या सामूहिक उठावाच्या माध्यमातून स्थापन झालेले अंतरिम सरकार सर्व प्रकारचे भेदभाव आणि मानवी हक्कांचे उल्लंघन संपविण्याचा निर्धार करत आहे. हे सरकार प्रत्येक नागरिकाचे मानवी हक्क जपण्यासाठी कटिबद्ध आहे."
पुढे ते म्हणाले की, "मानवाधिकार म्हणजे भूक आणि भीतीपासून मुक्ती आणि स्वातंत्र्य. मानवी हक्कांच्या संरक्षणाशिवाय कोणत्याही देशाचा आणि राष्ट्राचा विकास शक्य नाही. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय सेवा, नागरी आणि राजकीय हक्क, भाषण आणि विचारस्वातंत्र्य या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच देशाची समृद्धी सुनिश्चित करता येते. सध्याचे अंतरिम सरकार देशातील लोकांचे नशीब सुधारण्यासाठी आणि त्यांचे मानवी हक्क सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहे. मानवाधिकार आयोगाच्या एकूण कामाला गती देण्यासाठी सरकारसह सर्व संबंधितांचे सहकार्य कायम राहील, असा मला विश्वास आहे."