ठाणे : २०१९ साली जनमताचा अनादर झाला, हे मतदार विसरले नसून राज्याची दशा कुणी केली आणि राज्याला दिशा कुणी दिली हे जनतेला माहित आहे. त्यामुळे कल्याणकारी योजना आणि विकासकामांच्या जोरावर महाराष्ट्रातील मतदार महायुतीलाच बहुमताने निवडून देतील. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी ठाण्यात व्यक्त केला.
ठाण्यातील कोपरी- पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बुधवारी (ता.२० नोव्हे.) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वागळे इस्टेट मधील एलिमेंट आयटी पार्क मतदान केंद्रांवर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर त्यांच्यासोबत पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे यांनी देखील मतदान केले. तत्पूर्वी लुईसवाडी येथील निवासस्थानी पत्नी लता शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण केले. मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. गेल्या पाच वर्षातील अडिच वर्षाचा कारभार महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. २०१९ ला जनतेने दिलेल्या मतांचा अनादर करत अपेक्षेविरुद्ध चुकीच्या पद्धतीने सरकार आले. ही घटना जनता अजूनही विसरलेली नाही. गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कुणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा कोणी दाखवली हे जनतेला माहित आहे. कल्याणकारी योजना व विकास लोकांना माहित आहेत. सर्वसामान्यांसाठी आम्ही अनेक योजना आणल्या याचे समाधान आहे. या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी महायुतीने प्रयत्न केल्याने राज्यातील जनता समाधानी आहे. तेव्हा, जनता महायुतीला, विकासाला भरभरून मतदान करून लोकशाही बळकट करणार आहे. त्यामुळे येणारें सरकार महायुतीचे किंबहुना बहुमताचे असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.