महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुंबईकरांना आवाहन, मविआचे नेते तुष्टीकरणाचे गुलाम बनलेत!

    15-Nov-2024
Total Views | 37
narendra modi

मुंबई : “महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि मुंबईत शपथविधीची तयारी करा,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी मुंबईकरांना केले. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “महाराष्ट्रात अनेक संत आणि विद्वानांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. आज एकीकडे महायुतीची विचारधारा य परंपरेचा गौरव करते, तर दुसरीकडे महविकास आघाडीचे लोक वारंवार महाराष्ट्राच्या गौरवाचा अवमान करत आहे. ते तुष्टीकरणाचे गुलाम बनले आहेत. त्यांनी राम मंदिराला विरोध केला, मते मिळवण्यासाठी ‘भगवा आतंकवाद’सारखा शब्द आणला, वीर सावरकरांचा अपमान करतात आणि काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ परत आणण्यासाठी प्रस्ताव परित करतात. राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे ठीक आहे. परंतु, ज्यावेळी विकासाची वेळ येते, तेव्हा प्रत्येकाने देशाला कायम आपल्या पक्षाच्या वर ठेवले पाहिजे. भाजप आणि महायुतीचा हा मंत्र आहे. परंतु, महाविकास आघाडीच्या लोकांसाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे भारताच्या प्रत्येक विकासावर ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात,” असा घणाघात पंतप्रधानांनी केला.

मी तुमच्या स्वप्नांसाठी जगतो

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे, तर महायुती स्वप्नांना साकार करणारी युती आहे. जनतेचे स्वप्न हाच आमचा संकल्प आहे. मी तुमच्या स्वप्नांसाठी जगतो आणि ते पूर्ण करण्याचे आश्वासन देतो. जगातील प्रत्येक देश आज आपल्या शहरांना आधुनिक बनवत आहेत. महायुतीने मुंबईसाठी हेच स्वप्न पाहिले आहे. आमचे सरकार मुंबईला कनेक्टिव्हिटीच्या प्रत्येक समस्येतून मुक्ती देऊ इच्छितो,” असे आश्वासन त्यांनी दिले.

‘त्या’ दिवशी ठाकरेंना चांगली झोप लागेल!

उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “महाविकास आघाडीतील एका पक्षाने बाळासाहेबांचा अपमान करणार्‍या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या युवराजांच्या तोंडून एकदातरी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ हे वदवून घेण्याचे आव्हान मी त्यांना दिले होते. ज्या दिवशी हे होईल, त्या दिवशी तुम्हाला चांगली झोप लागेल आणि दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही,” असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

‘एक है तो सेफ है!’

‘स्वातंत्र्यानंतर देशात अनेक दशके काँग्रेसचे सरकार होते. परंतु, त्यांनी मुंबईच्या विकासासाठी कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे मुंबई मागे पडत गेली. प्रामाणिकपणा आणि कायम पुढे जात राहणे हा मुंबईचा स्थायी स्वभाव आहे, तर काँग्रेसचा स्थायी स्वभाव याच्या अगदी विरोधी आहे. काँग्रेसचा स्थायी स्वभाव केवळ भ्रष्टाचार आणि देशाला मागे खेचत राहणे, हाच आहे. त्यामुळे असे लोक कधीही मुंबईला पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत. मुंबईत प्रत्येक जाती-धर्माचे लोक राहतात.

काँग्रेसला त्यांच्यात वाद निर्माण करायचा आहे. त्यांना एससी, एसटी आणि ओबीसींमध्ये फूट पाडायची आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास तुमचे आरक्षण रद्द करेल. ज्याप्रमाणे, काँग्रेसचे युवराज देश संपवण्याची भाषा करतात. त्यामुळे मी कायम सांगतो, ‘एक है तो सेफ है’. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे,” असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. “महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि मुंबईत शपथविधीची तयारी करा. मी तर म्हणेन की, ही माझी प्रचारसभा नसून महायुती सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मी आज आलो आहे. हरियाणामध्ये काँग्रेसच्या स्वप्नांना चक्काचूर केले. झारखंड आणि महाराष्ट्रात हरियाणापेक्षाही चांगले प्रत्युत्तर जनता महविकास आघाडीला देणार आहे,” असेही ते म्हणाले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121