दि. २३ नोव्हेंबरला मुंबईसह महाराष्ट्रावर भगवा फडकणार
महायुतीचे राज्य पुन्हा येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ
12-Nov-2024
Total Views | 20
2
मुंबई : “विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार असून अनेकजणांना निकालाची उत्कंठा लागून राहिली आहे. त्यांना मी खात्रीशीरपणे सांगू इच्छितो, दि. २३ नोव्हेंबर रोजी मुंबईसह महाराष्ट्रावर भगवा फडकेल; महायुतीचे राज्य पुन्हा येईल; ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
( Devendra Fadanvis ) यांनी सोमवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी व्यक्त केला.
गोरेगाव आणि वर्सोवा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ओशिवरा येथील ‘म्हाडा’ मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी गुजरातचे मंत्री जगदीश विश्वकर्मा, खासदार जसवंत सिंह परमार, वर्सोवा मतदारसंघातील उमेदवार भारती लव्हेकर, गोरेगावमधील उमेदवार विद्या ठाकूर, राजहंस सिंह, पवन त्रिपाठी, संजय पांडे यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “अडीच वर्षे सत्तेत असलेल्या ‘महाभकास’ आघाडीने विकासकामांना स्थगिती देण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही. २०१४ साली देशासह महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्त्वात ’एनडीए’चे सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर आम्ही मुंबईचा चेहरा बदलण्याचे काम केले. त्यापूर्वी मुंबईकरांना केवळ स्वप्ने दाखवली जायची. काहीही न करता ’करून दाखवलं’ म्हणून पोस्टर लावले जायचे. केवळ सर्वसामान्यांची दिशाभूल करून २५ वर्षे मुंबईवर राज्य केले. तत्कालीन काँग्रेस सरकारने ११ वर्षांत केवळ ११ किमी मेट्रो तयार केली. आम्ही पाच वर्षांत ३४५ किमी मेट्रोचे जाळे तयार केले. त्यातील १०० किमी मार्गिका पूर्णत्वास आली आहे. ही आमची गती आहे.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेतून ९० लाख प्रवासी प्रवास करू शकतील, अशी व्यवस्था आम्ही उभी केली. आता मेट्रोतून ७० लाख अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे मुंबईला गतिमानता येणार आहे. एकट्या वर्सोवा मतदारसंघात नऊ मेट्रो स्थानके तयार झाली आहेत. त्यामुळे इथल्या स्थानिकांना मुंबईच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचता येईल. कोस्टल रोड, अटल सेतूसारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण अभियांत्रिकी अविष्कार जगाला दाखवून दिला,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
“वांद्रे-वर्सोवा सी-लिंकचे काम आपण सुरू केले. परंतु, महाभकास आघाडीने ते बंद पाडले. आम्ही पुन्हा सत्तेत येताच, हा प्रकल्प गतिमानतेने पूर्ण करण्याचे आदेश दिले. मी मुंबईकरांना आश्वस्त करतो, येत्या अडीच-तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. वर्सोव्यातून नरिमन पॉईंटपर्यंत २० मिनिटांत पोहोचता येईल. वर्सोवा ते विरार अशी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा भार कमी होईल. पश्चिम उपनगराला आम्ही सागरी महामार्गाने जोडणार आहोत,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘उबाठा’ने मराठी माणसाला बेघर केले!
मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणार्या उबाठाने मराठी माणसासाठी केलेले एकतरी काम सांगावे. यांनी गोरेगावच्या पत्राचाळीतील मराठी माणसाला बेघर केले. परंतु, भाजप महायुती सरकारने या प्रकल्पासाठी पुन्हा निविदा काढून मराठी माणसाला हक्काचा निवारा दिला. त्यासाठी विद्या ठाकूर यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.