मुंबई : केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहिर केला आहे. केंद्राच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत केले जात आहे. महत्वाचे म्हणजे मराठीसह पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली या भाषांदेखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मराठी कलाकार आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर मराठी कलाकारांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानिमित्ताने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सलील कुलकर्णी म्हणाले की, “मित्रांनो अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ज्या भाषेत आपण स्वप्न पाहतो, ज्या भाषेमध्ये आपण वेदना व्यक्त करतो, ज्या भाषेमध्ये आपण विचार करतो, त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण ही माझ्यासाठी, सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळे आपल्या भाषेची पोरं आहोत.”
पुढे कुलकर्णी म्हणाले, “लहानपणापासून आपण ज्या भाषेचा चष्मा लावून जगाकडे बघितलं, ती भाषा जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळवते तेव्हा आपल्या सगळ्यांना मनापासून समाधान वाटतं. गेली २७, २८ वर्ष मराठी कविता, मराठी गाणी गाण्याचा जो आनंद मिळाला. तर आज हा आनंद द्विगुणित झाला आहे आणि यानिमित्ताने ज्या, ज्या ज्येष्ठ मंडळींनी आपली मराठी भाषा जपली, वेचली आणि आपल्यापर्यंत पोहोचवली. त्या सगळ्यांचे आपण आभार मानायला पाहिजेत. कारण त्या सगळ्यांमुळे मराठी भाषा आपल्या पिढीपर्यंत पोहोचली. त्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो आणि भाषेला नमस्कार करतो. ज्यांनी, ज्यांनी प्रयत्न करून आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार,”
तर, अभिनेते सुबोध भावे यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, “अभिजात भाषा, मराठी भाषा! केंद्र सरकार आणि पं

तप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे लढले त्या प्रत्येकाला मनापासून वंदन.”
लेखक क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहे की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल…आता आपली मराठी बोलण्याची, वाचण्याची, पाहण्याची, जपण्याची जबाबदारी वाढलीय….फक्त उत्सव नाही, जगण्यात मराठी आणूया…फक्त प्रमाण नाही, बोलीत मराठी सजवूया…फक्त जुनं नाही, नवीन कला, साहित्य घडवूया…फक्त जपणूक नाही, मराठी चौफेर वाढवूया…”