नवी दिल्ली : जम्मू – काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ आहे, मात्र, कोणत्याही स्थितीस चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज आहे, असे प्रतिपादन भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरूवारी पत्रकारपरिषदेत केले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी लष्करातर्फे आयोजित वार्षिक पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भारतीय लष्कराची भूमिका स्पष्ट केली.
पाकिस्तानी लष्कर राजोरी आणि पुंछ भागात दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित होत आहे. अशा परिस्थितीत देशद्रोही शक्ती योजना आखत आहेत, त्यावर लवकरच नियंत्रण येईल. 2003 ते 2017-18 या काळात राजोरी आणि पुंछमध्ये शांतता होती. मात्र, गेल्या सहा महिन्यांत या भागातील दहशतवादी कारवाया चिंतेचा विषय बनल्या आहेत. एलओसीवर युद्धविराम आहे. मात्र घुसखोरीचे प्रयत्न केले जात असले तरी भारतीय लष्कर ते हाणून पाडत आहे. ड्रोनच्या माध्यमातून सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी होऊ नये यासाठी लष्कराने एक मजबूत ड्रोनविरोधी यंत्रणा तयार केली आहे, अशी माहिती लष्करप्रमुखांनी दिली.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी चीनच्या सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सीमेवरील परिस्थिती स्थिर असली तरीही ती अजूनही तणावपूर्ण आहे. सीमेवर आमची तयारी उच्च दर्जाची आहे. पूर्व लडाखमध्ये कोणत्याही स्थितीस तोंड देण्यासाठी सैन्यास आवश्यक ती संसाधने पाठविणे सुरूच राहणार आहे. आमची ऑपरेशनल तयारी उच्च पातळीवर आहे. लडाखमधील एलएसी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे, असेही लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी नमूद केले आहे.
राष्ट्रहितासाठी सैन्याने महत्त्वाचे निर्णय घेतले
भारतीय लष्कराने देशहितासाठी मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. काळाच्या मागणीनुसार लष्करातील आधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध पद्धती अधिक मजबूत करण्यात आली आहे. लष्करात नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येत आहे. उत्तम दळणवळण यंत्रणा, ड्रोन आणि पाळत ठेवणे या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जोरदार प्रगती करत आहे. भारतीय लष्कर देशाच्या विविध यंत्रणा आणि राज्य सरकारांशी समन्वयाने काम करत राहणार आहे. भारतीय लष्कराची सायबरस्पेस क्षमता वाढवली जात आहे. भारतीय लष्कराच्या कर्मचार्यांना तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि संस्थात्मक, प्रक्रियात्मक आणि तांत्रिक उपायांद्वारे सायबर डोमेनचा प्रभावीपणे उपयोग करण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले आहे.