नवी दिल्ली : देशाच्या प्रगतीमध्ये कोणत्याहील प्रकारचे अडथळे येऊ नयेत, यासाठी भारतविरोधी वक्तव्ये करणाऱ्यांविषयी ‘मूकदर्शक’ होऊ नका; असा सल्ला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जोधपूरस्थित राष्ट्रीय विधी विद्यापीठातील (एनएलयू) विद्यार्थ्यांना नुकताच दिला आहे.
तुम्हाला भारतविरोधी अजेंड्यास प्रत्युत्तर द्यावेच लागेल. कोणतेही कारण नसताना कोणीही आपल्या देशाचा अपमान करू शकत नाही. अशा वक्तव्याविरोधात तुमच्यासारखा बुद्धिवादी वर्ग गप्प बसला तर देशाच्या प्रगतीस खीळ बसेल आणि तसे होता कामा नये, अशी आशा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.
परदेशात जाऊन भारतविरोधी वक्तव्ये करणाऱ्या काही राजकीय नेत्यांचे नाव न घेता उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना सावध केले. ते म्हणाले, ‘ते’ परदेशात जातात आणि आपल्या देशातील संस्थांना कलंकित करून उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. ‘त्या’ व्यक्तींचे असे प्रयत्न योग्य असल्याचे तुमचे मत असेल तर तुम्ही त्याचे समर्थन करा. मात्र, ‘ती’ व्यक्ती चुकीची असल्याचे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याविरोधात मूकदर्शक न होता भूमिका घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्यावेळची शांतता तुमच्या कानात पुढील १०० वर्षे गुंजत राहिल आणि त्यावेळी मी शांत का होता, हा प्रश्न तुम्हाला छळत राहिल; असेही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यावेळी म्हणाले.
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही
केंद्रीय तपासयंत्रणांकडून चौकशीची नोटीस मिळाल्यानंतर त्यास विरोध करणाऱ्यांवरही उपराष्ट्रपतींनी टिप्पणी केली. प्रत्येक जण कायद्यास जबाबदार असून कायद्याचे हात कोणापर्यंतही पोहोचू शकतात. मात्र, भारतात सध्या एक विचित्र शैली अंगिकारली जात आहे. एखाद्या व्यक्तीस चौकशीची नोटीस मिळाल्यास ती व्यक्ती त्याविरोधात न्यायालयात येण्याऐवजी रस्त्यावर येते. मात्र, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसल्याचे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे.