होय, मुख्यमंत्र्यांचे ‘ठाणे’ बदलतेय!

    14-Aug-2023
Total Views | 68
Thane development


एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ‘ठाणे’ विकासाच्या केंद्रस्थानी आले. त्यामुळे शहरातील प्रत्येक घडामोड अथवा समस्या मुख्यमंत्र्यांशी जोडली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे ‘ठाणे’ बदलण्याचा चंग ठाणे महापालिकेने बांधला. त्याची फलश्रुती दिसत आहे. यासंदर्भात दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ठामपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी संवाद साधून घेतलेला ठाणे शहराचा आढावा...


ख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले. सर्वप्रथम त्यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त बदलले. सप्टेंबर २०२२च्या अखेरीस ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा नवी मुंबईचा कायापालट करणारे धडाडीचे प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अभिजित बांगर यांच्याकडे सोपवली. ठाण्याची सूत्रे हाती घेताच आयुक्त अभिजित बांगर यांनी, सर्वप्रथम स्वच्छतेला प्राधान्य दिले. सुरुवातीच्या काही दिवसांतच नागरिकांना अपेक्षित असलेले बदल घडवण्यासाठी जागोजागी पसरलेल्या कचराकुंड्या हटवल्या. दरम्यान, डिसेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्र्यांचे ‘बदलते ठाणे’ ही व्यापक मोहीम हाती घेतली. शासनाकडून भरीव निधी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासकीय पाठबळ लाभल्यानेच ही मोहीम आता ठाण्यात दृश्य स्वरूपात दिसू लागली आहे.


Thane development

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे ‘बदलते ठाणे’ या संकल्पनेतून आयुक्त अभिजित बांगर यांनी विकासात्मक कामाच्या माध्यमातून शहराचे रुपडे पालटताना स्वछता, आरोग्य आणि शिक्षण ही त्रिसूत्री अधिक भक्कम करण्याचे काम केले.ठाणे शहराचा ‘मेकओव्हर’ करताना त्यांनी महत्त्वाचे विषय हाती घेतले. त्यात स्वच्छता, सौंदर्यीकरण, रस्ता, शौचालय आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये शहरातील स्वच्छतेवर विशेषत्वाने भर दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा पडलेला नसावा, यासाठी काही संस्थात्मक बदल करून गुणात्मक बदलही केले आहेत. त्यामुळेच आज शहरातील १५० ठिकाणी कायमस्वरूपी कचरा टाकणे बंद झाले आहे.

शहर स्वच्छतेचा भाग म्हणजे रस्ते सफाई करणे. यासाठी रोड स्विपिंगच्या निविदा प्रक्रिया नव्याने राबविण्यात आल्या असून कामे सुरू झाली आहेत. ‘डोअर टू डोअर’ कचरा संकलन तसेच, रस्त्यांची यांत्रिक सफाई करण्यासाठी दोन अत्याधुनिक वाहने पालिकेच्या ताफ्यात आली असून आणखी चार वाहने घेतली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनेतून ही मशिनरी घेतली जात आहे. दिवा डम्पिंग बंद करण्याबाबत अनेक वर्षांची मागणी होती. तेव्हा, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार दिवा डम्पिंग कायमस्वरूपी बंद करून भंडार्ली येथे पर्याय उपलब्ध करण्यात आला, तेथेही कालमर्यादेचे बंधन आल्याने आता डायघर येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचरा निर्मूलनासाठी व्यवस्था उभारण्यात आली आहे. याशिवाय बंद झालेल्या दिवा डम्पिंगवरील कचर्‍यावरदेखील प्रक्रिया करून त्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘बायो मायनिंग’ प्रक्रिया सुरू असून दोन वर्षांत ‘कचरामुक्त दिवा’ दिसेल, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.

आपल्याला शहराचा अभिमान तेव्हा वाटेल जेव्हा आपले शहर स्वच्छ असेल. त्यामुळे स्वच्छतेला सौंदर्यीकरणाची जोड देण्यात आली आहे. त्यात मनमोहक भित्तीचित्रे, म्युरल्स आदी उभारले असून, शहरात विविध ठिकाणी आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. नुकतेच लोकार्पण झालेल्या ज्ञानसाधना महाविद्यालयानजीकच्या भुयारी मार्गातील विलोभनीय चित्रे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पर्यावरणाचा विचार करून वनसंपदा जपण्यासाठी तसेच तलाव संवर्धनासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला आहे.ठाणे स्थानकात दररोज सात लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. तेव्हा रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले. यात सुरुवातीला फेरीवाल्यांचा अडथळा होता. फेरीवाल्यांमुळे स्टेशन परिसराला अवकळा आली होती. त्याचबरोबर काही अपप्रवृत्तींमुळे महिलांची सुरक्षाही धोक्यात आली होती. फेरीवाले हेदेखील व्यवस्थेचाच भाग आहेत. पण, ‘हॉकर्स अ‍ॅक्ट’नुसार नागरिकांना त्रास होऊ नये, हा व्यापक विचार करून, ठाणे महापालिकेने सर्वप्रथम ठाणे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त केला. येथे सातत्य ठेवून येथे सतत देखरेख ठेवून फेरीवाले उठवण्यात आले. आता या फेरीवाल्यांची पर्यायी व्यवस्थाही केली जात आहे. यात अर्थातच लोकप्रतिनिधींचा सहभाग मोलाचा ठरल्याचे बांगर यांनी आवर्जून नमूद केले.


Thane development

रस्ते निर्माण व शौचालय दुरूस्तीसाठी शासनाकडून मोठी मदत मिळाली. २१४ कोटी व ३९१ कोटी असा तब्बल ६०५ कोटींचा निधी शासनाने रस्त्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पावसाळ्यानंतर हाती घेतली जाणार आहेत. नवीन उभारलेल्या रस्त्यांवर खड्डे नाहीत. तरी सध्या खड्डेमुक्त रस्ते देण्याचा प्रयत्न सुरू असून रस्त्यांवर पडलेले खड्डे १२ तासांच्या आत मास्टिक पद्धतीने बुजवण्यात आले आहेत. केवळ महापालिकाच नाही, तर अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डेही बुजवण्यात आले. तसेच रस्त्यांवर पर्यावरणपूरक एलईडी पथदिवे बसवण्यात आले आहेत.

ठाण्याची लोकसंख्या पाहता, ५० टक्के नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करतात. त्यांना सार्वजनिक शौचालयांचाच वापर करावा लागतो. पण, या शौचालयांची अवस्था बिकट होती. यासाठी ठाणे महापालिकेतील विविध विभांगातील सुमारे ३५ ते ४० कोटींचा निधी आणि शासनाकडून आलेल्या ७५ कोटी निधीतून प्राधान्याने कामे सुरू आहेत. प्रत्येक शौचालयामध्ये पाण्याची व्यवस्था करणेही गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून काम सुरू आहे. त्यामुळे दृश्य स्वरूपात स्थापत्य कामे तसेच देखभाल दुरूस्तीसह स्वच्छतेसाठी नवी मुंबई मॉडेल अंगीकारले असून, दि. २० सप्टेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहरातील आरोग्य व्यवस्था फारशी सक्षम नव्हती. ती सुधारण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू असून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी शासनाकडून सुरुवातीला आठ कोटीनंतर ६० कोटींचा निधी आला आहे. डॉक्टर, नर्स, आयसीयू, प्रसूतिगृह, शिशू आयसीयू यांची संख्या वाढवण्यात आली आहे. या रुग्णालयाचा भार हलका व्हावा आणि मुंब्रा, दिवामधील रहिवाशांना जवळच उपचार मिळावेत, यासाठी कौसा येथील रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे. कळवा रुग्णालयात तर प्रतीदिन १ हजार, २०० ते १ हजार, ५०० बाह्यरुग्ण उपचारार्थ येत असून माता-बाल रुग्णालयातही रुग्णांची मोठी संख्या असते. कॅश काऊंटर नसलेले गंगुबाई शिंदे हे रुग्णालय किसननगरमध्ये, तर कळवा रुग्णालयात धर्मवीर हार्टकेअर रुग्णालय कार्यरत आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळणे गरजेचे असते. हे हेरून शाळांची ‘फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर’ सुधारण्यासह शाळांमध्ये वाचनालय तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात येत आहे. पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल घटकांतील आहेत. केवळ खासगी शाळेची फी परवडत नाही म्हणून नाईलाजास्तव पालिका शाळा हा पर्याय मनाला अस्वस्थ करणारा आहे, म्हणूनच बदलत्या ठाण्यातील पुढचे ‘व्हीजन’ दर्जेदार शाळा आहे. उत्तम शिक्षण मिळते म्हणून ठाणेकर पालिका शाळांमध्ये आपल्या मुलांना घालतील, अशी व्यवस्था उभारली जात आहे. त्याचबरोबर दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सीएसआर’मधून लॅपटॉप तसेच अन्य बक्षिसे देऊन गौरविण्यात आले आहे. शाळांमध्ये संगणक पुरवून आधुनिक तंत्रज्ञानाने शिक्षण सर्वांनाच मिळायला हवे, याकडे कटाक्ष ठेवला आहे.

‘वॉटर, मीटर, गटर’ याबरोबरच शहराची सांस्कृतिक ठेवण उत्तम हवी असते. शहरात गडकरी रंगायतन तसेच डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या माध्यमातून सांस्कृतिक वसा जपण्यात येतो. यातील जुन्या झालेल्या गडकरी रंगायतनच्या ‘मेकओव्हर’साठी शासनाने आठ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. शासनाकडून एक रुपयांचा निधी आला तरी आपण एक रुपया एक पैशाचे काम करून देण्याचा दंडक ठेवला आहे. म्हणजेच कुठलेही काम हे सर्वोत्तमच व्हायला हवे, याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

शहरामध्ये केवळ ‘फिजिकल इन्फ्रास्ट्रकचर’ नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक स्वास्थ्य राखले जावे, यासाठी ‘विचारमंथन व्याख्यानमाला’ सुरू केली आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते. हा उपक्रम ऑनलाईन पाहण्याचीही सुविधा पालिकेने उपलब्ध केली आहे. त्यामुळे भविष्यात ’ठाणे तिथे काय उणे,’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
बदलत्या ठाण्यातील आव्हाने
बदलत्या ठाण्यात भविष्यात आणखीही काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा संकल्प आहे. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत शहराचा कायापालट होत असताना क्लस्टर, वॉटरफ्रंट, खाडी किनार्‍याचे सुशोभीकरण, कोस्टल रोड, कोपरी सॅटिस, तीनहात नाका तसेच अन्य महत्त्वाच्या चौकातील कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना ही कामे दृष्टिक्षेपात आहेत. विकासात्मक कामे करताना दुर्दैवाने आरोग्य आणि शिक्षण याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. कारण, या दोन्ही बाबी अत्यावश्यक असल्या तरी पालिकेच्या शब्दकोशात तातडीच्या गरजा नाहीत. त्या समस्या नसून गरज आहे, याकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात आहे.
ठाणे शहराचा विकास हा झपाट्याने होत असून शहरातील बदल हे नागरिकांना दिसत आहेत. शहराच्या विकासामध्ये महापालिकेबरोबरच नागरिकांचा सहभागदेखील महत्त्वाचा असतो. त्यानुसार ठाण्याचा विकास वेगवान पद्धतीने होत आहे. ठाणे शहर हे खड्डेमुक्त, कचरामुक्त, स्वच्छ आणि सौंदर्यीकरणाने नटलेले दिसत असून ठाण्यात विविध सेवासुविधा प्राप्त होत आहेत. ही समाधानकारक बाब आहे. (एकनाथ शिंदे ,मुख्यमंत्री, महाराष्ट्र)
‘वॉटर, मीटर आणि गटर’ ही पालिकेची नेहमीचीच कामे. महापालिका म्हटली म्हणजे ढिसाळ कारभार असा प्रघात. पण, हे सूत्र बदलण्यासाठी तसेच ठाणे शहराचे रुपडे पालटण्यासाठी ‘स्वछता, आरोग्य आणि शिक्षण’ या त्रिसूत्रीवर भर देत केवळ ‘फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर’ नव्हे, तर शहराचे सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्यही उत्तम राखले जावे, या भावनेतून ठाणे महापालिका काम करीत आहे. अर्थातच मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने ’ठाणे’ बदलण्याचे हे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान स्वीकारले असून आता दृश्य स्वरूपात बदल दिसत आहेत. (अभिजित बांगर, आयुक्तठाणे महानगरपालिका)




-दीपक शेलार 


 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121