मुंबई : मुंबई शहरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि. २९ जुलै २०२३ पर्यंत पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, या आदेशांमुळे बृहन्मुंबई हद्दीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करुन ध्वनिवर्धकाचा, सांगीतीय बँड वाजवणे, फटाके फोडणे यास या आदेशानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे.
तसेच, मुंबईतील विवाह समारंभ आणि विवाह प्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.
तसेच, मुंबई शहरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले.