मुंबई : महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, खतांच्या किंमतीवरुन विजय वडेट्टीवर आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यात चकमक झाली. यावेळी दोघेही आक्रमक झाले होते. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस बियाणांविषयी बोलताना मोठी घोषणा केली आहे. बोगस बियाणांसंदर्भात याच अधिवेशनात कायदा आणणार, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. विजय वडेट्टीवार यांनी खतांच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवरती 20 टक्क्यांनी कमी झाले आहे, तर मग या ठिकाणी कमी का होत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. अधिकचा दर देऊन खत खरेदी करावा लागत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
यावर उत्तर देताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, "बोगस बियाणांबाबत निर्णय केला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्याठी कारवाई व्हावी यासाठी बिटी कॉटनप्रमाणे कायदा करणार आहोत. त्यासाठी समिती नेमली आहे. याच अधिवेशनात बोगस बियाण बाबत कायदा आणला जाईल. खताचे भाव वाढलेले नाहीत, विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जर किंमती कमी झाल्या असतील तर त्या भारतातही कमी झाल्या असतील. अधिक दराने विक्री करणाऱ्या कंपन्यांची नावे वाचून दाखवत त्यांना नोटिसा बजावत परवाने रद्द का करू नये याची विचारणा केली आहे. असेही मुंडे म्हणाले.
आशिष शेलारांचा विरोधी नेत्यांवर निशाणा
यावेळी आशिष शेलार म्हणाले, "विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये विरोधी पक्षनेता होण्यासाठी चढाओढ सुरु आहे. थोरात, अशोक चव्हाण, वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि इतर नेते मीच विरोधी पक्षनेता आहे हे दाखविण्यासाठी प्रयत्न करत आहेत."