मुंबई : 'अंबादास दानवे यांनाच विरोधी पक्ष नेते पदावर राहण्याचा अधिकार नाही. नीलम गोऱ्हे यांना नैतिकता शिकवण्या आधी त्यांनी राजीनामा द्यावा'. अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर टीका केली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेवरून विरोधी पक्षांनी सभात्याग केला आहे. त्याला उत्तर देतांना प्रवीण दरेकर यांनी अंबादास दानवे यांनीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
सोबतच प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे आणि विरोधकांच्या आघाडीवर सुध्दा टीका केली. ते म्हणाले की, "आदित्य ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. विरोधी पक्षनेता नाही याचं कारण विरोधी पक्ष गांगरलेल्या अवस्थेत आहे. पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्व भक्कम आणि सक्षम आहे. त्यामुळे विरोधी पक्ष हे फक्त नेत्यांची मोट बांधतील. जनता त्यांच्यासोबत जाणार नाही.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकार आणि विरोधकात मोठा गदारोळ झाला आहे. शेकापाचे आमदार जयंत पाटील यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर आक्षेप घेतला होता. काही दिवसांपुर्वीच नीलम गोऱ्हे या उबाठा गटाला सोडून शिवसेनेत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी उबाठा गटाने केली आहे.