मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली. यानंतर पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली, तर मच्छर मारायला धमक्यांची गरज काय असा टोला आ. नितेश राणेंनी संजय राऊतांना लगावला आहे. मोदी सरकारने ९ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने काही कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असून ते नागपूर विमानतळावर बोलत होते.
नितेश राणे म्हणाले की, "पवार साहेबांची सगळी काळजी घेण्याची जबाबदारी ही आमच्या सरकारची आहे. तुम्ही ज्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेत आहात, आता मच्छर मारण्यासाठी काही कोणाला धमकी देण्याची गरज नाही. पायाच्या खाली बुट हलवला तरी तो मरतो. त्याला काही धमकीचा विषय नाही."
"संजय राऊत विरोधात पत्राचाळ प्रकरण आहे, कोविड सेंटर घोटाळा प्रकरण आहे, एका महिलेने ही त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. कोणत्या केसमध्ये आत जातील, हे येणाऱ्या काळात ठरेल. राऊतने मराठी लोकांची घरे लुटली होती, तो कुठला क्रांतिवीर नाही तर ४२० आहे." अश्या शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.